प्रत्येक माणसाच्या जीवनात काही माणसं कायम ऊर्जा देत असतात. ती ऊर्जा घेऊन समोरचा व्यक्ती अगदी मनापासून आपल्या प्रगतीच्या पाऊलवाटा शोधत धावत असतो.अशी ऊर्जा, प्रेरणा देणारी,काही समजून सांगणारी आणि समजही देणारी मित्रमंडळी जेव्हा जीवनात येतात तेव्हा आपल्या जीवनाचं सोनं होतं. मित्र म्हणजे गाराव्यासारखा अशी अनुभूती याच दरम्यान आपणास येत असते. व्यंकट अर्थात व्यंकटेश चौधरी असाच एक अवलिया मित्र म्हणून आमच्या जीवनात आला आणि आमच्या जीवनाचं सोनं झालं.
तू नेहमीच एका शून्यात रमत गेलास आणि त्या शून्यातूनच तुझ्या प्रज्ञा प्रतिभेचे अंकुर सर्वदूर पसरत गेले. अन् गेल्या तीन साडेतीन दशकापासून प्रेरणा साहित्य परिषदेच्या रुपाने सुरू झालेला तुझा,माझा आणि गोविंदचा प्रवास लीलया डोळ्यासमोरून चल चित्रपटासारखा सरकत गेला…..
तुझं लेकरांप्रती असलेलं प्रेम आणि शिक्षण क्षेत्रातील तुझा विविध उपक्रम आणि शिक्षकांना प्रचंड प्रेरणा देऊन उपक्रमशील बनवलंस. शिक्षकांना बळ दिलस आणि त्यांच्या कर्मयोगाला गतिमान केलास.तुझा उपक्रमांप्रति असलेला वावर नेहमीच शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना बळ आणि ऊर्जा देणारा ठरत आला. जसं शिक्षण क्षेत्रात तुझं मोठं योगदान.शिक्षणासोबतच साहित्य क्षेत्रातही तुझं मोलाचं योगदान पाहून मला कायम तुझ्या कार्यकर्तृत्वाचा अभिमान वाटत आला आहे…..
ई.सन १९९०-९१ चा काळ तू गोलेगाववाडीला, गोविंद आजमवाडीला आणि मी हरसदला तिघेही तीन ठिकाणी शिक्षक म्हणून आपण तिथेच नावारूपाला आलो.आपण तिघेही आपापल्या कामातून आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून तालुका आणि जिल्ह्यात आपण परिचित झालो.आपण जरी अंतराने थोडे लांब असलो तरी अंतरिक मनाने मात्र खूप जवळ असल्याचा कायम मनात भास होत असे. तू, मी किंवा गोविंद तिघांपैकी कोणीही एकाने हाक दिली की हातातली सगळी काम सोडून आपण प्रेरणेसाठी एकत्र येत असू. त्याकाळी आपण दोघे एकत्र दिसलो की अनेक शिक्षक मंडळी किंवा आपल्या संपर्कातील अनेक जण तिसरा कुठे गेला असं विचारायचे.आपण इतके एकमेकात गुंतत गेलो होतो .जसे नव्याने प्रेमाला सुरुवात झालेल्या प्रेमी युगुलागत आपण मिसळत गेलो कायम एकमेकात.प्रेरणा साहित्य परिषदेचे ते भारावलेले दिवस, प्रत्येक साहित्य संमेलनातील तुझा आणि गोविंद चा नियोजन आणि कार्यक्रमातील वावर, माझ्यावरची नांदेडची संपूर्ण जबाबदारी आपण तितक्याच समर्थपणे पूर्ण करत प्रेरणा साहित्य परिषदेचे जवळपास पाच सहा साहित्य संमेलने अगदी यशस्वी करून आपण प्रेरणा साहित्य परिषदेची वेगळी पाऊलवाट निर्माण केली होती. अखिल भारतीय साहित्य संमेलनात जसे उपक्रम असतात तसे सगळेच उपक्रम आपल्या पत्रिकेत असायचे.त्यावेळी या पाऊलवाटे वरून अनेक नवोदित कवी ,साहित्यिक आणि लेखक चालत गेले आणि आज तेच कवी साहित्यिक आणि लेखक नामवंत आणि कीर्तीवंत म्हणून पुढे येत आहेत. हे पाहताना आज मनस्वी आनंद होतो आहे. साहित्य संमेलन संपल्यानंतर आपण जेव्हा एकत्र बसू तेव्हा मात्र तिघांपैकी एक जण नक्की रडलेला असायचा.साहित्य संमेलनाच्या नियोजना संदर्भात तुम्ही अधून मधून नांदेडला येत असत त्यावेळी मी सिडको येथील एमडी ४२ मध्ये राहत होतो. दोन खोल्याचं घर त्या घरात पाच-सहा माणसं त्यात तुम्हीही आनंदाने तिथेच रमत असत. घर जरी लहान असलं तरी आपली मनं मात्र मोठी होती. त्याचा प्रत्यय आज नक्कीच येतो…
मन्वंतर या संपादित प्रतिनिधीक काव्यसंग्रहापासून सुरू झालेला तुझा साहित्य लेखनातील प्रवास कायम आम्हाला ऊर्जा देत राहिला. तुझी प्रत्येक कविता आणि प्रत्येक शब्द कायम मला लिहायला आणि वाचायला बळ देत गेला. पुढे तुझे गंधबन,अनाहत आणि इतर काही कवितासंग्रह प्रकाशित झाले. तुझ्या प्रत्येक कवितेवर महाराष्ट्रातील अनेक दिग्गज साहित्यिकांनी अनेक वेळा तोंड भरून स्तुती करताना मी ऐकली आहे. ती स्तुती ऐकताना माझे डोळे आणि उर भरून येत असे. साहित्य वर्तुळातील तुझी प्रज्ञा आणि प्रतिभा कायम महाराष्ट्राच्या साहित्य वर्तुळात गुणवत्तापूर्ण चर्चेचा विषय ठरत आला आहे. एखाद्या विषयावरचे तुझे चिंतन आणि तुझी मांडणी कायम वेगळी वाट निर्माण करणारी आहे. गंधबना नंतर अनेक वर्ष तू लिहिता राहिलास आणि त्यानंतर दोन कवितासंग्रह साहित्य वर्तुळात दाखल झाले. कुठलाही सोस नसताना तुझं कायम लिहीतं राहणं, वाचनाची प्रचंड आवड आणि चिंतन कायम प्रेरणा साहित्य परिषदेचं मोठेपण अबाधित राखण्यात तुझा मोठा वाटा राहत आला आहे. आपण तिघे आपापल्या कामात व्यस्त झालो आणि प्रेरणा साहित्य परिषदेकडे थोडे दुर्लक्ष झाले. त्या काळात जोडलेली अनेक मंडळी आजही भेटली की प्रेरणा साहित्य परिषदेचे काय चाललंय असं जेव्हा विचारतात. तेव्हा मन मात्र चर्र झाल्यासारखं होतं….
जसा तू साहित्यात नितळ आणि निर्मळ आहेस. तसाच तू तुझ्या वागण्यात आणि जगण्यात नितळ आणि निर्मळ आहेस. कुणाला खुश करावं म्हणून तू कधीच तोंडावरची स्तुती केली नाहीस. तुला जे पटलं ते आणि नाही पटलं ते तू तोंडावरच बोलून दाखवलंस. म्हणूनच म्हणतात फटकळ माणसाचं मन निर्मळ असतं. म्हणून अनेक जण तुझ्या या वागण्याचा मनापासून स्वीकार करतात. तर काहींना खटकलं असलं तरीही तुझ्यावर जिवापाड प्रेम करतात आणि आपल्यात काही दुरुस्ती करता येतील का याचा विचार करत आपल्या वागण्यातील त्या दुरुस्त्या सुधारत असतात. शिक्षण,साहित्य,प्रशासन आणि कौटुंबिक नाते दृढ करण्यासाठी तू ही सगळी आयामं कायम अत्यंत आपलेपणाने आणि सहजरीत्या पूर्ण करत तू त्यातील प्रतिसाद कायम लिलया पूर्ण करत गेलास. घरात तू बालाजी दादांच्या नंतरचा दुसरा भाऊ परंतु कायम मोठ्या भावाच्या भूमिकेत तू वावरत गेलास. मोठ्या अन्नाच्या लेकरांना, किशोर आणि हमु यांना मोठं करण्यात बाबा नंतर तुझा मोठा वाटा राहिला आहे.या सगळ्या घटकातील तुझं अस्तित्व कायम इतरांना हवंहवंसं वाटत गेलं आणि त्या वाटण्यातील तुझा तो गोडवा तितकाच अधिकाधिक सुगंधित होत गेला. माय गेल्यानंतरचे काही दिवस तसे अवघड दिवस होते. परंतु त्याही संकटातून तू सावरून तू पुन्हा आपल्या कामाला लागल्यास.बाबा आजारी असताना तुझ्या अवघडलेल्या प्रशासनातून वेळातला वेळ काढून कायम बाबांना भेटायला जायचास. बाबा म्हणजे तुझा खूप मोठा आधार आणि श्वास होता. बाबांचा तुझ्यावर प्रचंड जीव आणि तुझाही बाबांवर जीव यामुळे मला कायम तुम्हा बापलेकांचं कौतुक वाटत आलं आहे. बाबा आजारी आहेत असं कळाल्यानंतर एकदा नांदेडे सर,मी तू नंदगावला गेलो होतो. नांदेडे सरांना पाहून बाबांनाही आनंद झाला होता. बाबा आणि तू कायम मित्र असल्या सारखे राहत असे. त्या दिवशी बाबाच्या चेहऱ्यावर थोडा तणाव दिसत होता. परंतु नांदेडे सरांना, तुला आणि मला पाहून बाबाच्या चेहऱ्यावरचा ताण दूर झाला. आणि काही काळ आपण बाबांच्या समवेत अगदी हसत हसत काही वेळ घालवला. रात्र होत होती नांदेडला निघायला वेळ होईल म्हणून बाबांचा निरोप घेऊन आपण निघालो. तेव्हा बाबाचा चेहरा पडलेला दिसून आला. ती बाबांची आठवण आणि भेट शेवटची ठरली.
तुझ्या जीवनात अनेक चांगली माणसं येत गेली काही कायम अंतःकरणात बसली तर काही निष्टूनही गेली. तुझ्या लग्नाची गोष्ट तशी मजेशीर आहे. घरात आणि मित्र परिवारात तू लग्न करणार नाहीस असा विषय झाला. बाबा थोडे अस्वस्थ होते. मी हरसदला शिक्षक म्हणून कार्यरत होतो. शाळेत असताना केवळाबाई पांचाळ (तुझ्या सासूबाई) दररोज त्यांच्या नातवांना शाळेत घेऊन यायच्या. त्यावेळी त्या नेहमी मला म्हणायच्या की, सर आपल्या बाईसाठी एखादा मुलगा असेल तर पहा असं एक-दोन दिवसाआड त्या नेहमी म्हणायच्या. एके दिवशी अचानक मला असं वाटलं तुला विचारून पहावा आणि मी कंधारला येऊन तुझ्यासोबत भीत भीतच चर्चा केली. आणि तू म्हणालास पहिल्यांदा बाबाला विचारून पहा आणि मी त्याच दिवशी नांदगावला बाबाला भेटण्यासाठी गेलो. बाबांना हा विषय सांगितला. बाबा म्हणाले व्यंकटला तू बोललास का ? मी हो म्हणालो तेव्हा बाबांना प्रचंड आनंद झाला आणि दुसऱ्या दिवशी लगेच बाबा हरसदला मुलगी पाहण्यासाठी आले. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला आणि बाबांनी त्याच ठिकाणी आम्हाला मुलगी पसंत आहे. उद्या मुलाला पाठवतो असे म्हणून बाबा निघून गेले. दोन दिवसानंतर तू ही हरसदला येऊन गेलास आणि दोन दिवसानंतर मुलगी पसंत असल्याची बातमी तू माझ्याजवळ सांगितलीस. धुमधडाक्यात लग्नही झाले. तुझ्या कौटुंबिक जीवनाच्या सहप्रवासात (सोयरीक जुळविण्यात) माझा थोडा वाटा जरी असला तरी तू तुझ्या कौटुंबिक जीवनाचा प्रवास मात्र कधीच वेडा वाकडा होऊ दिला नाहीस. याचं मला कायम कौतुक आहे. अमृताच्या (छकुली) जन्मा अगोदर आणि पहिल्या बाळाच्या वेदना सोडल्या तर तुझा आजपर्यंतचा संपूर्ण सहजीवनाचा प्रवास कधी पाऊलवाट, कधी धोपट रस्ता,तर कधी समृद्धीच्या महामार्गावरचा तुझा तो सहजीवनवाट तू अत्यंत सुखरपणे पूर्ण केला आहेस. आज तुझ्या या सह जीवनाच्या वाटेवर अमृता (छकुली) आणि चिकू यांनी आपल्या कर्तृत्वाने निर्माण केलेला त्यांचा जीवनपट आजही आपल्या परिवारातील सगळ्या लेकरांना प्रेरणा देणारा आहे.
आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक नांदेडे सर कायम आपल्यावर जीव लावत गेले सरांच्या कर्तृत्वाचंआपणास अप्रूप वाटत असे. सरांना बेधडकपणे बोलणारा आपल्या परिवारातील तू एकमेव होतास तुझं माझं काही चुकलं तरीही सर अगदी दिलखुलासपणे तुझी माझी चूक पोटात घेत आपणावर ते जीवापाड प्रेम करत असत. तुला जे हवं ते अगदी हक्काने सरांकडे मागत राहिलास. आणि तुझी कोणती हाऊस सरांनी कधी नाही म्हटली नाही हे तुझं आणि नांदेडे सरांचंही मोठेपणाच म्हणावे लागेल.
तू नांदेड जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून जितका लोकप्रिय झालास. त्यापेक्षा जास्त प्रशासनात गेल्यानंतर शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि आता नांदेड वाघाळा महानगरपालिकेत शिक्षणाधिकारी म्हणून तू खांद्यावर घेतलेली कर्तव्य आणि कर्तृत्वाची जबाबदारी तितक्याच समर्थपणे आणि कार्यकुशलतेने आणि विविधांगी नावीन्यपूर्ण उपक्रमाने तू पूर्ण करत आज लोकाभिमुख प्रशासनाचा तू नायक ठरला आहेस. शिक्षण प्रशासनातील तुझी प्रत्येक कृती विद्यार्थी हितासाठी आणि गुणवत्ता वाढीसाठी तू शिक्षकांच्या प्रेरणेच्या बळावर आणि तुझ्या कल्पकतेवर नांदेड जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात वेगळी उंची प्राप्त करून देण्यात यशस्वी ठरत आला आहेस. तू तुझ्या बीट आणि तालुक्यातील शिक्षकांसह जिल्ह्यातील अनेक शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना लिहीतं केलसं ही तुझ्या जीवनातील फार मोठे कमाई म्हणावी लागेल. तुझं सुंदर अक्षर ,कल्पक बुद्धिमत्ता या बाबीचा तर आम्हा मित्रमंडळींना कायम अभिमान आणि गर्व वाटत आला आहे…तसा तू मनाने निगरगठ्ठ आहेस आणि तितकाच तू हळवाही आहेस. जेव्हा मला अर्धांग वायूचा आजार झाला त्यावेळी तू ज्या ज्या वेळी मला भेटायला आलास त्या त्या वेळी माझी त्यावेळेसची अवस्था पाहून तू किती हळवा झाला होतास तोही अनुभव मी अनुभवला आहे. मित्र म्हणून तुझा मला कायम आधार आणि अभिमान वाटत आला आहे.
मी आणि तू बारड हायस्कूलला प्राथमिक शिक्षक असताना विद्यार्थी विकास साठी आणि गुणवत्ता वाढीसाठी राबविले गेलेले वेगवेगळे उपक्रम कायम ऊर्जा देणारे ठरत आले आहेत.दिनांक २१ जून रोजी मराठवाडा साहित्य परिषद ( म.सा.प.) शाखा नांदेड ची नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर झाली आणि त्यात तुझ्याकडे कोषाध्यक्ष पद सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली. ही जबाबदारी तू निश्चितच यशस्वीरिता पूर्ण करशील यात तीळ मात्र शंका नाही…..
मसापणे सोपविलेल्या या पदाचा उपयोग मराठवाड्यातील आणि नांदेड जिल्ह्यातील साहित्य वर्तुळात काम करणाऱ्या जुन्या आणि नव्या साहित्यकांना बळ देईल असा मला विश्वास वाटतो. तुझ्या या निवडीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. आता यापुढे तुझ्या खांद्यावर अनेक मोठमोठ्या जबाबदाऱ्या निश्चितच येत राहतील. अनेक जबाबदाऱ्या तुझ्याकडे येण्याची वाट पाहत आहेत. आणि त्या जबाबदाऱ्या तू तितक्याच यशस्वीपणे पूर्ण करशील असा मला निश्चितच विश्वास आहे. तुझ्या सेवानिवृत्तीच्या नंतरच्या वाटचालीसाठी व सुखमय व निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि शुभकामना…..शिवा कांबळे
नांदेड

