भारत जगात सगळ्यात मोठा लोकशाही देश.येथे अनेक रूढी,चाली,परंपरा,रितीरिवाज अनेक युगापासून चालू आहेत.यात काही चांगल्या आहेत.काही वाईट आहेत.मला माझ्या काळातील शाळा,माझे गुरुजी आठवतात.त्या काळाचे हुबेहुब चित्र मनचक्षू समोर उभे राहते.मी त्या आठवणीत रमून जातो.माला माझ्या गावातील जुन्या शाळेतून सकाळचा घंटानाद ऐकू येतो.आम्ही चिमुकले विद्यार्थी हातात पाटी किंवा दप्तर घेऊन शाळेच्या आवारात प्रवेश करतोत. पायात चपला नाहीत. जवळ फुटकी पाटी तरी आमच्या डोळ्यांत उत्सुकतेचं तेज आहे.त्याचवेळी वर्गखोलीच्या दाराशी एक व्यक्ती उभी आहे,साधा पांढरा शर्ट,खादीचा पायजमा,डोळ्यात मायेची चमक,एक टापटीप व्यक्ती आणि हातात पुस्तकांचा गठ्ठा.ही व्यक्ती म्हणजे आमचे गुरुजी.आम्ही विद्यार्थी वर्गात बसतो,आणि त्या शिक्षकाचा आवाज दगडी भिंतींवरून प्रतिध्वनित होतो.तो आवाज म्हणजे केवळ अक्षरांचा धडा नसते तर ते म्हणजे आयुष्याचं पुस्तक उलगडण्याची सुरुवात असते.
भारतात गुरु शिष्यांची परंपराही प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.कालानुरूप त्यात बदल झालेले आहेत.आई वडीलानंतर गुरुनाच मानाचे,आदराचे स्थान भारतीय समाज देतो.तसं पाहिलं तर आपण आयुष्यभर अनेक नात्यांतून जातो त्यात पालक,मित्र,सखी, नातेवाईक,सहकारी याचां समावेश होतो.याच्यां मुळेही आपल्या जीवनाला आकार मिळत असतेच;पण या सर्व नात्यांच्या पलीकडे एक असं नातं असतं जे आपलं आयुष्य घडवतं,विचारांची दिशा ठरवतं आणि व्यक्तिमत्त्वाला खरं सोनं बनवतं.ते नातं म्हणजे गुरु शिष्याचं.गुरुजी म्हणजे फक्त आपल्याला धडा शिकवणारा माणूस नव्हे;तर गुरू म्हणजे आयुष्याचं एक जिवंत पुस्तक आहे.हे जिवंत पुस्तक आपल्याला ज्ञान देतं,आपल्या विचारांना खाद्य देतं,आपल्या विचाराला चालना देते.आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेते.अंधारात दिशादर्शन करतं.गुरुजीचं आयुष्य म्हणजे अनुभवांची पानं आहेत.गुरुजी संघर्षांचे अध्याय आहेत,ते आदर्शांचे,प्रेरणेचं अमूल्य दालन आहेत.आपण विद्यार्थी त्या पुस्तकातील एक एक शब्द वाचतो, व त्यातून आपलं स्वतःचं जीवन घडत जाते.जीवनाचा मार्ग मिळत जाते.
गुरुजी फक्त अभ्यासक्रम शिकवण्याचं काम करत नाहीत.गुरुजी आपल्या विद्यार्थ्याच जीवनच घडवतात.गुरुजी आपल्या विद्यार्थ्याच्या डोळ्यांत स्वप्नं पेरतात,माणुसकीची पेरणी करुन मानव बनविण्याचे काम ते करतात.त्यांच्या विद्यार्थ्यांच्या इवल्या इवल्या पावलांना मार्ग दाखवतात.गुरुजी बालकांच्या मनात चांगुलपणाचं बीज रोवतात.गुरुजी आपल्याला विद्यार्थ्याना ज्ञानापलीकडचं शहाणपण देतात.उदा.गुरुजी गणित शिकवताना ते फक्त आकडे मोजायला किंवा करायला आपणास शिकवत नाही;तर चुकलं तर पुन्हा प्रयत्न करायचा धडा शिकवतात.प्रयत्नाने यश मिळवता येते ही शिकवण आपल्याला मिळते.इतिहास शिकवताना किंवा सांगताना गुरुजी केवळ राजे-रजवाड्यांची नावे किंवा थोतांड माहिती सांगून थांबत नाहीत,तर भूतकाळातून भविष्य घडवायची शिकवण आपणास देत असतात.विज्ञानाच्या प्रयोगातून विद्यार्थ्यामध्ये जिज्ञासेची ज्योत पेटवतात.अज्ञानाचा अंधार दूर करून विज्ञानवादी बनविण्याचा प्रयत्न करतात.साहित्य शिकवताना ते केवळ कविता,धडे शिकवत नाही,तर भाव भावना ओळखायचं कौशल्य आपल्याला शिकवतात.म्हणुन मला वाटते गुरुजी म्हणजे आपल्या जीवनातील जीवंत पुस्तक,त्या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर प्रेरणा,ज्ञान,मूल्यं, प्रेम,करुणा,दया,वात्सल्य तुडूंब भरलेले आहे.आपण हे पानं वाचतोत,दररोज वाचावे,त्या पानांतूनच आपलं स्वतःचं आयुष्य घडत जाते.आपण मोठे झालो,जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांतून गेलो तरी शिक्षकाचे धडे आपल्याला आपल्या जीवनात नवनवीन अर्थ देत राहतात.गुरुचं आयुष्य म्हणजे एक त्यागमय प्रवास आहे.गुरुजीचं आयुष्य म्हणजे साधेपणाचं आणि त्यागाचं पुस्तक.गुरुजी म्हणजे चालतं बोलतं मूल्यांचं पुस्तकच.
सावित्रीबाई फुले यांचं उदाहरण घ्या.समाजाच्या टोमण्यांना,दगडांना न घाबरता त्या शाळेत जात राहिल्या.कारण त्यांना माहीत होतं विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणं हाच त्यांचा श्वास आहे.त्यांचं आयुष्य म्हणजे त्यागाचं सर्वोत्तम पुस्तक.गुरुजीचं एक वाक्य,एक हसू,एक स्पर्श विद्यार्थ्यांच्या मनावर कायमचा ठसा उमटवून जातो.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलंय की,बालपणीचे शिक्षक आय्यादुराई सोलोमन यांनी त्यांना विज्ञानाची आवड लावली.जर ते शिक्षक नसते,तर कदाचित भारताला मिसाईल मॅन मिळाला नसता.आपल्या प्रत्येकाच्याच जीवनात असं घडलं असेल.एखादा शिक्षक आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवतो आणि तो विश्वास आयुष्यभर सोबत राहतो.म्हणूनच विद्यार्थी मोठा झाल्यावर डॉक्टर,अभियंता, लेखक काहीही झाला तरी तो म्हणतो,“आज मी जे आहे,ते माझ्या शिक्षकांमुळे आहे.”
आज गावोगावच्या शाळांना खिडक्यांना पट नसतात,काच नसतात,बाकं मोडकी किंवा नसतातच.गुरुजीना बसायला खुर्ची नसते,लिहायला मोडका फळा असतो पण तरीही शिक्षक वर्गात उभा राहतो.स्वतःच्या मुलांना कमी वेळ देतो,पण शेकडो विद्यार्थ्यांना भविष्य देतो.कधीकधी पगार वेळेवर मिळत नाही;पण विद्यार्थ्यांच्या डोळ्यातलं हास्य त्याच्यासाठी सर्वांत मोठं बक्षीस असतं.खरे थोर शिक्षक अनेकदा आपल्याच आजूबाजूला असतात;पण ते समाजाला दिसत नाही.
शिक्षकांच्या वर्तनातून शिकलेलं मूल्यं पुस्तकातून शिकता येत नाहीत.ती शिक्षकांच्या वागण्यातून शिकली जातात.उदा.गुरुजी वेळेवर शाळेत आले की आपण शिस्त शिकतो.ते इतरांना मदत करतात तेव्हा आपण सहकार्य शिकतो.ते प्रत्येक विद्यार्थ्याकडे समान दृष्टीने पाहतात तेव्हा आपण न्याय,समता व समानता शिकतो.गुरुजी चुकणाऱ्याला माफ करतात तेव्हा आपण करुणा,दया व प्रेमभाव शिकतो.
विद्यार्थ्यांना आज इंटरनेटवरून ज्ञान सहज मिळतं आहे;पण शहाणपण आणि जीवनमूल्यं देणारं माध्यम अजूनही शिक्षकच आहेत.सध्याला अधिकारी,पदाधिकारी फक्त गुणवत्ता मागतात. गुणवत्ता म्हणजे काय तर गुण किती ? म्हणून या स्पर्धेच्या युगात शिक्षण व गुरुजी फक्त गुणांपुरतेच मर्यादित झालेले आहेत.खेड्यापाड्यात अजूनही पुरेशा शाळा नाहीत.शिक्षकांवर प्रशासकीय भार वाढतोय.खेडेगावात राहाण्याला घर मिळत नाही.बऱ्याच गावाना रस्ता नाही.दळवळणाची सोय नाही.तरीपण या सगळ्यातही शिक्षक विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्य देण्यासाठी झगडतोय.आजच्या युगातील शिक्षक आणि त्यांच्यासमोरील आव्हानं वेगळी आहेत.आजचा शिक्षक त्याच्या अनेक आधुनिक समस्यांनी,त्यांच्या अधिकाऱ्यांनी निर्माण केलेल्या समस्यांनी ग्रासलेला आहे.शिकवण्याचे काम कमी व कागदोपत्री घोडे नाचवण्याचे काम आजचे गुरुजी करताना दिसतात.गुरुजीचे काम विद्यार्थाला मिळालेल्या गुणांवर मोजले जात आहेत.तंत्रज्ञानामुळे शिक्षकाचा मान कमी होतोय असं वाटतं.ग्रामीण भागात अजूनही मूलभूत सुविधा नाहीत;पण या सगळ्यांवर मात करूनही शिक्षक आजही मुलांच्या जीवनात प्रकाश आणत आहेत.शिक्षक शिक्षणप्रशिक्षण व नवनवीन प्रयोगाने शिक्षण क्षेत्र पार चिबाडून गेलय.एक ना धड भाराभर चिंध्या सारखं प्रकार चालू आहे. स्पर्धेच्या धावपळीत फक्त आजही शिक्षकच विचार करतोय की समाजाचं भविष्य आमच्या हातात आहे.कारण आजचा माझा विद्यार्थी म्हणजे उद्याचा नागरिक आहे.शिक्षक जे बीज पेरतो,त्याचं झाड समाजात उगवतं.तो प्रामाणिकपणाचं बी पेरतो,तर समाज प्रामाणिक होतो.तो हिंसाचार नाकारतो,समाज शांततेकडे झुकतो.एखादं राष्ट्र कसं असेल हे जाणून घ्यायचं असेल,तर त्याचे शिक्षक कसे आहेत हे जाणून घ्यावे लागते.प्रत्येक विद्यार्थ्याची शिक्षकाप्रती खरी कृतज्ञता ही आयुष्यभर असते.जेव्हा एखादा विद्यार्थी यशस्वी होतो आणि म्हणतो “गुरुजी,तुमच्यामुळे मी इथंपर्यंत आलोय.” तेव्हा त्या शिक्षकाचं पुस्तक जणू सुवर्णाक्षरांनी भरून जाते.माझ्या विद्यार्थी मित्रांना मला येथे आठवण करून द्यावयाचे आहे की आज आपण कितीही उंचावर पोहोचलो तरी आपण ज्या पुस्तकातून वाचन सुरू केलं केले ते पुस्तक विसरू नका कारण त्या पुस्तकाचं नाव आहे आपले प्रिय “गुरुजी ….” खरं तर गुरुजी आपल्याला विद्यार्थी ते माणूस बनवतात.
एखादा गुरुजी विद्यार्थ्याला एखाद्या चुकीपासून परावृत्त करतो,तर एखादा दुसरा त्याला नवं स्वप्न दाखवतो.गुरुजी म्हणजे आईच प्रेम आणि वडीलाचा धाक याचं एक रुप आहे.काही शिक्षक कठोर असतात,काही प्रेमळ,काही विनोदी;पण प्रत्येकाचं पुस्तक वेगळं आणि समृद्ध असतं.जीवनात शिक्षकाचं स्थान आई-बाबा नंतर महत्वाचं असते. आई बाबा आपल्याला जन्म देतात ;पण जीवन कसं जगायचं हे शिकवणारा शिक्षक असतो.एक डॉक्टर रुग्ण वाचवतो;पण डॉक्टर घडवणारा शिक्षक असतो.एक अभियंता पूल बांधतो;पण अभियंता घडवणारा शिक्षक असतो.एक लेखक जगाला विचार देतो;पण लेखक घडवणारा शिक्षक असतो.म्हणूनच समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात गुरुजीचं योगदान मूलभूत आहे.प्रेरणादायी शिक्षकांच्या पावलांवर चालणं,त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालणे म्हणजेच आपलं आयुष्य समृद्ध करणं आहे.हे सगळं कोणत्याही पुस्तकातून पूर्णपणे शिकता येत नाही.शिक्षक स्वतःच्या वागणुकीतून हे मुलांना शिकवत असतो.
शिक्षकाचे आयुष्य म्हणजे एक त्यागमय प्रवास आहे.हे त्यागमय प्रवासाच पुस्तक छापलं जातं तेव्हा शिक्षकाच्या आयुष्याच्या प्रत्येक अध्यायामागे त्याग,संयम आणि अपार प्रेम दडलं असतं.कमी पगारातही शाळा चालवणारे शिक्षक.स्वतःच्या घरापेक्षा,स्वतःच्या मुलापेक्षा शाळेतील विद्यार्थ्यांच्या भविष्याला प्राधान्य देणारे गुरु.गावागावात पायपीट करून ज्ञानाची ज्योत पेटवणारे शिक्षक.त्यांचं आयुष्य खरंच विद्यार्थ्यांसाठी लिहिलेलं अक्षरांचं महाकाव्यच आहे.डॉक्टर,इंजिनीअर,लेखक,कलाकार जेव्हा तो मागे वळून पाहतो तेव्हा त्याला एखादा शिक्षक नक्की आठवतो.त्याचं एखादं वाक्य, त्याचा एक सल्ला,त्याचा दिलेला आत्मविश्वास… हे आयुष्यभरासाठी मार्गदर्शक ठरतं.गुरुजी म्हणजे अक्षरांतून आपल्याला दिलेली आयुष्यभराची उर्जा आहे.
काही होवो,काळ कितीही बदलो,आज आपण कितीही मोठे झालो,तरी आपण ज्या पुस्तकातून वाचन सुरू केलं ते पुस्तक कधीच विसरू नका.कारण शिक्षक हेच आपलं पहिलं आणि शेवटचं पुस्तक आहे,जे आयुष्यभर आपल्या मनात जिवंत राहतं.
माझ्या सर्व गुरुना व माझ्या प्रिय शिक्षक बांधवाना गुरू गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
राठोड मोतीराम रुपसिंग
विष्णुपुरी,नांदेड – ६.
९९२२६५२४०७ .

