आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात बालकांमध्ये वाचनाची आवड रुजवणे काळाची गरज आहे. कारण वाचन संस्कृतीतून संस्कारांचे बीजारोपण होत असते. मुले संस्कारी झाली, तर पर्यायाने समाज संस्कारीत घडतो. एकंदरीत बालसाहित्य, किशोर साहित्य, मुळात कोणत्याही साहित्याचे मुलांच्या, समाजाच्या जडणघडणीत फार मोठे योगदान आहे. यातच सुप्रसिद्ध लेखिका स्वाती कान्हेगावकर यांच्या ‘झाड एक मंदिर’ या सुंदर किशोर कादंबरीने मोलाची भर घातली आहे. मुळातच, अंतरबाह्य देखण्या, वाचनीय आणि नीती मूल्यांनी ओतप्रोत भरलेल्या,’ झाड एक मंदिर ‘ या किशोर कादंबरीची महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ मान्यता यादीत निवड झाल्याने पुन्हा एकदा या कादंबरीने लक्ष वेधून घेतले आहे.
मुलांचे मनोरंजन करणे, त्यांना बोध देणे, मूल्य संस्काराची रुजवणूक करण्याचे कार्य प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बालसाहित्यातून किंवा किशोर साहित्यातून घडत असते. म्हणजेच साहित्य हे एक प्रकारचे अनौपचारिक आणि सहज शिक्षणाचे प्रभावी माध्यम म्हणून कार्य करीत असते. साहित्याकडून विशेषतः बाल किंवा किशोर साहित्याकडून असलेली ही अपेक्षा ‘झाड एक मंदिर’ ने अगदी उत्तमरीत्या पूर्ण केली आहे.
या कादंबरीतून सुंदरवाडीची सुंदर कथा लेखिकेने अतिशय रोमांचक आणि उत्कंठावर्धक रीतीने साकारली आहे. कादंबरीतील हेमाआजी मुलांना हसत-खेळत, मनोरंजनातून शिकवण्याचा, त्यांच्यात संस्कार रुजवण्याचा यशस्वी प्रयत्न करते. या कादंबरीतून केवळ मुलांनाच नाही, तर प्रत्येक वयोगटातील वाचकांना मोलाची शिकवण लेखिका देतात.बदललेली कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था लेखिका दर्शवतात. पण त्याचवेळी प्राप्त परिस्थितीतही योग्य मार्ग शोधण्याची सकारात्मकता वाचकांच्या मनावर बिंबवतात. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात गेलेली मुलं नातवंड; त्यांच्या विरहात,आठवणीत झुरणारी हेमाआजी; निसर्ग, झाडे, वेली, पर्यावरण आणि यांच्या सानिध्यात बहरणारं समृद्ध बालपण हरवलेली जग्गु आणि त्याची दोस्त मंडळी, आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर रडत बसत नाहीत, तर आपले आपले मार्ग शोधतात व एकमेकांचे आधार बनतात. आजीला नातवंड भेटतात व मुलांना आजी भेटते.
‘ झाड एक मंदिर ‘ मधील किशोरवयीन मुलं खोडकर पण चौकस, निरागस तरीही प्रगल्भ, जितकी हुशार तितकीच संवेदनशील असल्याचे लेखिकेने रेखाटले आहे. लेखिका स्वाती कान्हेगावकर यांनी कादंबरीतील मुले ही मातीचा गोळा नाही तर ऊर्जेचा स्त्रोत असल्याचे सिद्ध केले आहे.
एकमेकांमध्ये निकोप स्पर्धा असली तरी, ईर्षा, द्वेष, असूया, मत्सर असू नये, एकमेकांशी न भांडता शंका न घेता मिळून मिसळून रहावे ही शिकवण सहजरीत्या लेखिका देतात स्वतःची कामे स्वतः करावी, घरी आईला व बाहेर अंध-अपंग किंवा गरजू व्यक्तीला मदत करावी. तसेच पोटच्या मुलांसाठी आई-वडील किती आणि काय काय करतात, हे सर्व अगदी अलगदपणे लेखिका किशोरवयीन वाचकांचा मनावर बिंबवतात. त्याचवेळी पालकांनाही,अगदी नकळत पण महत्त्वाची जाणीव त्या करून देतात; ‘आपल्या पाल्यांना, मुलांना नेहमीच मायेच्या पंखाखाली दडून ठेवू नका, मुक्त आकाशात त्यांना स्वच्छंदपणे उंच भरारी घेऊ द्या!’ हल्लीच्या पालकांची आपल्या मुलांप्रती अतिरेकी काळजी आणि सुरक्षितता पाहून,’ त्यांना उंच उडू द्या, तेव्हाच त्यांच्या पंखात बळ येईल ! ‘, हा लेखिकेचा सल्ला अगदी योग्य वाटतो.
खरे तर जाती-धर्म, धार्मिक स्थळ, या सगळ्यांचा अट्टहास मोठ्या माणसांचा असतो. मोठी माणसेच जाती धर्माच्या भिंती समाजात उभारतात. द्वेषाने उभारलेल्या भिंतींनी धार्मिक स्थळं सजवू पाहतात. या सगळ्यात धर्माची, थोर महात्म्यांची, थोर पुरुषांची शिकवण, तत्व सगळं जाणीवपूर्वक विसरून जातात. ‘ झाड एक मंदिर ‘ या किशोर कादंबरीतून स्वाती कान्हेगावकर यांनी सांगितलेली श्रीकृष्णाची शिकवण, तथागत भगवान गौतम बुद्धांनी जगाला दिलेला संदेश प्रौढवाचकांनाही विचार करायला भाग पाडणारा आहे.
समाजात आजही ‘नाना- तात्या’ सारखी चांगली माणसे आहेत, हेच सांगण्याचा लेखिकेने या कादंबरीतून प्रयत्न केला आहे. मला वाटतं,या पात्रांची निर्मिती केवळ कादंबरीतील कथानकाची आवश्यकता म्हणून नाही,तर वाचकांचा विशेषतः किशोरवयीन वाचकांचा चांगुलपणावरचा विश्वास दृढ व्हावा, पर्यायाने त्यांच्यात सकारात्मकता रुजवावी या उद्देशाने स्वाती कान्हेगावकरांनी नाना व तात्या या आदर्श व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. एवढेच नाही, तर कादंबरीतील मुलांच्या मनात व सर्वच वाचकांच्या मनात पर्यावरण संवर्धनाची व सत्कर्माची, परोपकाराची एक नवज्योत प्रज्वलित केली आहे.
कादंबरीचे ‘झाड एक मंदिर’, हे शीर्षक अतिशय सार्थ आणि समर्पक असे आहे. त्याचबरोबर आगळे वेगळे आणि औत्सुक्यपूर्ण देखील आहे. कादंबरीची भाषाशैली किशोरवयीन वाचकांना अनुसरून अगदी साधी-सोपी तरीही रसाळ अशी आहे. छोटी-छोटी वाक्य अर्थ सुलभ ठरतात. काही वेगळे किंवा वैशिष्ट्यपूर्ण शब्दांची उकल किंवा विश्लेषणही लेखिका, हेमा आजींच्या तोंडून अगदी सोप्या पद्धतीने करून देतात. आवश्यकतेनुसार कादंबरीत पात्र आणि त्यांना अनुसरून संवाद, हे कादंबरीला गतिमानता प्राप्त करून देतात.
‘ मुलांसाठी लिहितांना, स्वतः मूल होऊन जगावं लागतं, मुलांशी एकरूप व्हावं लागतं, तेव्हाच खरं मुलांचं भावविश्व साकार करता येतं! लेखिका स्वाती कान्हेगावकर या मुलांच्या भावविश्वात एकरूप होतात म्हणूनच त्या मुलांच्या भावनांचे प्रभावीपणे प्रगटीकरण करू शकतात. उदाहरणार्थ जग्गुच्या तोंडचे वाक्य, ” घ्या झाला सगळा पचका!” किंवा गोष्ट ऐकता ऐकताच भांडण उकरून काढणाऱ्या मनुला रीना ने दिलेले सडेतोड उत्तर, ” ए, माझं कशाला नाव घेतेस गं? तू पण तशी खडूसच आहेस ना!” यासारखी वाक्य किशोरवयीन मुलांचे प्रतिनिधित्व करतात. एकूणच, साध्या-सोप्या प्रतिमा, प्रतीके, उदाहरणे देऊन मूल्य, नीतितत्वे, संस्कार रुजवण्याचा प्रयत्न देखील लेखिकेने सहजपणे तरीही समर्थपणे केला आहे.
बहुरंगी, मोठी बोलकी चित्रं असलेलं कादंबरीचं अंतरंग खूप देखणं आहे. अतिशय आकर्षक, समर्पक, पूर्णपानी चित्र कादंबरीचा दर्जा उंचावतात. केवळ चित्रच नाही, तर संपूर्ण कादंबरीच बहुरंगी आणि दर्जेदार पृष्ठांची आहे. मुलांना आवडेल, त्यांच्या मनाला भावेल असेच याचे स्वरूप आहे! तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे चित्र आणि त्यांच्या मागे पसरलेली दिव्य पिवळी, सोनेरी आभा!आहाहा! किती विलक्षण सुंदर चित्र आहे ते! मोठ्यांचंही मन शांत,स्थिर करणारं ते चित्र मोठं मोहक आहे! ‘गोवर्धन गिरीधारी’ श्रीकृष्णाचे चित्र मोठे सूचक असल्याचे मला वाटते! ‘चराचर सृष्टीचे रक्षण करणारा’ श्रीकृष्ण, झाड तोडून मंदिर बांधायला आलेल्या लोकांवर ही कृपा छत्र धरलेला आहे की काय?असे वाटत असतानाच, वटवृक्षाचे संरक्षण करणारा सद्गृहस्थ श्रीकृष्ण पेक्षाही मोठा वाटू लागतो. नव्हे, कादंबरीच्या शेवटी मोठाच ठरतो! एकूणच, मुखपृष्ठ, मलपृष्ठ किंवा संपूर्ण कादंबरीत साकारलेली बहुरंगी चित्रं, सुप्रसिद्ध मुखपृष्ठकार, चित्रकार सरदार जाधव यांनी मोठी उठावदार अशी रेखाटली आहेत. ज्यामुळे,कादंबरीत जिवंतपणा आला आहे. माधव चुकेवाड यांची प्रस्तावना आणि डॉ. अलका पोतदार यांच्या पाठराखणीने कादंबरीला पूर्णत्व प्राप्त झाले आहे. लेखिकेने एका उदात्त, परोपकारी विषयाची मांडणी कादंबरीतून करताना, आपली अर्पण पत्रिकाही अशाच उदात्त, परोपकारी व्यक्तींना समर्पित केली आहे. हे कादंबरीच्या विषयाशी असलेली समर्पकता वाचकांचे विशेष लक्ष वेधून घेते.
एकूणच, पर्यावरणाबरोबरच नीती मूल्यांची रुजणूक करणारी, उत्कंठा वाढवणारी, वाचकांना गुंतवून ठेवणारी सुखान्त कादंबरी एवढेच नाही,तर ‘झाड एक मंदिर’ ही कादंबरी वाचनीय आणि संग्राह्य असल्याचे महाराष्ट्र शासन ग्रंथ मान्यता निवड यादीत समाविष्ट झाल्याने सिद्ध झाले आहे. नुकताच या कादंबरीने लेखिका स्वाती कान्हेगावकर यांना “आई” हा विशेष पुरस्कार मिळवून दिला ! त्याबद्दल स्वाती कान्हेगावकर यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!

किशोर कादंबरी :- “ झाड एक मंदिर ”
लेखीका :- स्वाती कान्हेगांवकर
प्रकाशन :- दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.
मुखपृष्ठ :- सरदार जाधव
पृष्ठसंख्या :- 72
मुल्य :- 170/-
पुस्तक परीक्षण :- सुवर्णा बाबुराव कळसे
संवाद-7709312766

