ग्रामपंचायत निवडणुक निकालाचे पडघम : भाग दोन

महाराष्ट्रातल्या 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील सर्वच पक्षांनी ‘आम्हाला यश मिळाले’ चा सूर लावला आहे. अनेक नेते, वेगवेगळे पक्ष स्वत:च्या विजयाचा दावा करत आहेत. आमचाच पक्ष नंबर वन असून आमच्या मतदानात वाढ झाली वगैरे विधानं करीत सुटले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राज्यस्तरावर पहिल्यांदाच निवडणुका पार पडल्या आहेत.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये पक्षांच्या चिन्हांवर निवडणूक लढवली जात नाही पण ग्रामपंचायतींमध्ये मोठे नेते आपले पॅनेल उभे करतात. त्यामुळे या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. .

अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं राळेगण सिद्धी आणि औरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श गाव पाटोदा येथे बिनविरोध निवडणुकीला विरोध झाला. त्यामुळे इथल्या निकालांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पाटोदा इथला निकाल हाती आली असून आदर्श सरपंच भास्कर पेरे यांची मुलगी अनुराधा पेरे यांचा पराभव झाला आहे. त्यांना 187, तर विरोधी उमेदवाराला 204 मतं मिळाली आहेत. पाटोदा इथं 8 वॉर्ड बिनविरोध, तर 3 वॉर्डांमध्ये निवडणूक झाली. हिवरे बाजारची ग्रामपंचायत तब्बल 30 वर्षं बिनविरोध राहिली. आता मात्र इथं ग्रामपंचायतची निवडणूक झाली. इथली ग्रामपंचायत 7 जण सदस्यांची असून सगळ्या जागांसाठी निवडणूक झाली.

हिवरेबाजारमध्ये पोपटराव पवार यांची पुन्हा एकहाती सत्ता, सर्व जागा जिंकल्या आहेत. पोपटराव पवार यांच्या वॉर्डातील विरोधी उमेदवाराला 44 मते. तर पवारांचा 282 मते घेऊन विजय झाला. राळेगण सिद्धीत 3 वॉर्ड असून 9 सदस्यांची ही ग्रामपंचायत आहे. सद्यस्थितीला इथले 2 उमेदावर बिनविरोध ठरले असून 7 जागांसाठी निवडणूक झाली. यात विद्यमान सरपंच लाभेष औटी यांच्या ग्रामविकास पॅनेलनं सगळ्या 7 जागांवर विजय मिळवला आहे. हा पॅनल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या विचारांचा आहे.

साताऱ्यातल्या धनगरवाडीत ‘नोटा’ला सर्वाधिक मतं
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी गावामध्ये दोन प्रभागांमध्ये सर्वाधिक मते ही नोटाला देण्यात आली आहेत. पहिल्या प्रभागात 217 दुसर्‍या प्रभागात 211 मतं ही नोटाला देण्यात आली आहेत. या गावात एकूण नऊ सदस्यांची ग्रामपंचायत आहे. यावेळी सात सदस्य बिनविरोध निवडून आले होते. मात्र दोन जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली.

यावेळी गावकऱ्यांनी समजावून देखील उमेदवार आपल्या मतावर ठाम असल्याने ही निवडणूक झाली. त्यामुळे गावकऱ्यांनी एकी दाखवत नोटाला मतदान करण्याचा निर्णय घेतला. आता या प्रभागांमध्ये कोणाला विजयी करायचं, याबाबत तहसीलदारांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहून विनंती केली आहे.

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. तीन पक्ष असल्यामुळे आम्हाला चांगली स्पेस मिळाली. यापुढेही आम्हाला चांगली स्पेस मिळेल. मात्र, महाविकास आघाडीतील नेत्यांनीही सर्वाधिक जागांच्या विजयाचा दावा केला आहे. “ग्रामपंचायत निवडणुकीत 80 टक्के जागा महाविकास आघाडीला मिळाल्यात. महाविकास आघाडीवर जनतेनं विश्वास दाखवलंय. आमच्या कामावर लोक समाधानी आहेत,” असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

“विदर्भात 50 टक्के जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. विदर्भात काँग्रेसला निर्विवाद यश मिळालं तर चार हजार ते साडेचार हजार ग्रामपंचायती काँग्रेसला मिळाल्यात,” असा दावा थोरातांनी केला. भाजपवर टीका करताना थोरात म्हणाले, “भाजपची पिछेहाट हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे. भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आणि माजी प्रदेशाध्यक्ष यांच्या गावातच भाजपचा पराभव झालाय.”

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमधील सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. कारभाऱ्यांनो, आता मिळालेल्या संधीचं सोनं करा, जय-पराजय विसरून ग्रामविकासासाठी एकत्र या, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी सर्वांना केले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाहीचा पाया भक्कम करणारी आणि महात्मा गांधीजींचे ग्रामविकासाचे स्वप्न सत्यात आणणारी यंत्रणा आहे. या यंत्रणेतील ग्रामपंचायत हा महत्वाचा घटक आहे. या ग्रामविकासाच्या प्रक्रियेत काम करण्याची संधी आता तुम्हाला मिळाली आहे. गावाचा विकास करण्यासाठी लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी आता आणखी वाढली आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दाखविलेल्या विकासाच्या मार्गावर आपल्या गावाला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावं. जनतेचा विश्वास सार्थ ठरवत ग्रामविकासाचा आदर्श निर्माण करावा,” असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

6 हजार ग्रामपंचायतीमध्ये भाजप 1 नंबर असल्याचा दावा करण्यात आला. भाजप महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळालं आहे. सत्ताधारी पक्षांनी साम, दाम, दंड अशा सर्व पद्धतींचा उपयोग केला. पण तरी देखील भाजपाची विजयी घौडदोड ते रोखू शकले नाहीत. 14 हजार पैकी 6 हजार पेक्षाही अधिक ग्रामपंचायतींमध्ये भाजपा नंबर 1 असेल, असा विश्वास भाजपा प्रवक्ते केवश उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागले तेव्हा यामध्ये बहुतांश ठिकाणी भाजपाने मुसंडी मारल्याचे दिसत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकारपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यभरात सगळ्यांचं लक्ष लागलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाटोदा ग्रामपंचायतीत आदर्श सरपंच भास्कर पेरे यांच्या मुलीचा पराभव झाला आहे. तर अहमदनगर जिल्ह्यातल्या हिवरे बाजारमध्ये पोपटराव पवार यांच्या पॅनेलनं निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे.

चंद्रकांत पाटलांच्या खानापूर गावात शिवसेनेची बाजी
कोल्हापूर जिल्ह्यातील भूदरगड तातुक्यातील खानापूर ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मध्ये शिवसेनेने सहा जागा जिंकत बाजी मारली आहे. 9 जागांपैकी 6 जागावर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. खानापूर ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. या निवडणूकीत या ग्रामपंचायतीवर कुणाची सत्ता येणार यासाठी चुरस होती. खानापूर गावाच्या ग्रामपंचायत निकालावर भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे प्रकाश आबिटकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

खानापूर हे चंद्रकांत पाटील यांचं जन्मगाव आहे. या गावात आधी भाजपची सत्ता होती. मात्र निवडणूकीआधी झालेल्या पक्षांतरातून वेगळी समीकरणं समोर आली. या गावात शिवसेनेला रोखण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी कॉग्रेस, आणि काँग्रेस हे पक्ष एकत्र आले होते. विशेष म्हणजे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना खानापूरमध्ये मात्र भाजप प्रणित आघाडीसोबत दोन्ही काँग्रेस एकत्र लढल्या.

शिवसेनेच्या झेंड्याखाली बाळासाहेब पोपळे, राजू पाटील, मानसिंग दबडे यांची रांगणा माऊली आघाडी होती. तर भाजपचे प्रविण सावंत, राष्ट्रवादीचे संजय रेडकर आणि कॉंग्रेसचे भूजंगराव मगदूम यांची तळेमाऊली आघाडी होती. गेल्या विधानसभा निवडणूकीत आमदार चंद्रकांत पाटील हे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या राधानगरी – भूदरगड या मतदार संघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती.

त्यावेळी निवडणूक लढवून दाखवा असं आव्हान प्रकाश आबिटकर यांनी चंद्रकांत पाटील यांना दिलं होतं. त्यामुळं या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. सध्या प्रकाश आबिटकर हे शिवसेनेचे जिल्ह्यातील एरमेव आमदार आहेत. निवडणूकीनंतर महाविकास आघाडी सत्तेत आल्याने भाजप आणि शिवसेना यांच्यातली दरी वाढत गेली.

स्थानिक पातळीवर शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन्ही कॉंग्रेस भाजपसोबत गेल्याने खानापूरकडे सर्वाचं विशेष लक्ष लागलं होतं. त्यात प्रकाश आबिटकर यांनी सत्ता खेचून आणल्याने शिवसेनेचं पारडं जड झाल्याचं मानलं जातं आहे.

अहमदनगरमध्ये माजी मंत्री, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना धक्का बसला आहे. त्यांच्या शेजारच्या लोणी खुर्द गावात विखेंच्या संबंधित पॅनेलचा पराभव झाला आहे. 17 पैकी 13 जागा जिंकत विरोधकांनी विजय मिळवला आहे.
विखे यांच्या लोणी बुद्रुक गावातील निवडणूक यापूर्वीच बिनविरोध झाली आहे.

ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नसली तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि मनसे या पक्षांनी स्वबळावर ही निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं होतं. या निवडणुकीत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 79 टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे. मदान यांनी सांगितल्यानुसार, “राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा 11 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली होती. त्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अंशत: बिनविरोध झाल्या आहेत. सरपंच व सदस्यपदाच्या लिलावप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील 162 ग्रामपंचायतींसाठी 20 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. अशा विविध कारणांमुळे आज प्रत्यक्षात 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं.”

ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत यंदा दोन बदल करण्यात आले आहेत. पहिला म्हणजे सरपंच पदाची आरक्षण सोडत ग्रामपंचायत निवडणुकीनंतर जाहीर करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. याआधी ही सोडत निवडणुकीपूर्वी जाहीर होत अस. आता नवीन निर्णयानुसार, सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम तसंच सरपंच आणि उपसरपंच यांची निवड मतदानानंतर 30 दिवसांच्या आत राबवण्यात यावी, असे निर्देश सरकारनं दिले आहेत.

दुसरा बदल म्हणजे राखीव जागांवर ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास पडताळणी समितीकडे हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी केलेल्या अर्जाची पोचपावती किंवा अर्ज केल्याबाबतचा कोणताही पुरावा सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे.
मतदानानंतर एका वर्षाच्या जात पडताळणीचं प्रमाणपत्र सबमिट करावं लागणार आहे.

महाराष्ट्रातल्या १४ हजारहून अधिक ग्रामपंचायतींचे निकाल येत आहेत आणि महाराष्ट्राचं नवं राजकीय चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. राजकीय पक्षांच्या चिन्हांवर जरी या निवडणुका लढवल्या जात नसल्या तरीही पक्षांच्या विचारांचेच गट या निवडणुकांमध्ये असतात. त्यामुळेच या निवडणुका राज्यातल्या ‘महाविकास आघाडी’ सरकारची महत्त्वाची परीक्षा मानली जाते आहे.

या निवडणुकांचा एकंदरित कल पाहता या परीक्षेत ही आघाडी जी राजकीय समीकरणं ठरवून सत्तेत आली होती, ती समीकरणं गावपातळीपर्यंत घेऊन जाण्यात यशस्वी ठरताना दिसत आहे. पक्ष म्हणून भाजपच्या संख्येला अडथळा निर्माण करतांनाच, ‘महाविकास आघाडी’तल्या तीनही पक्षांनी वेगवेगळ्या निवडणुका लढवून, मतांची विभागणी करून स्वत:चा फायदा करून घेतलेला पाहायला मिळतो आहे.

महाराष्ट्रातल्या एकूण 14,234 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यातल्या 12,711 पंचायतींसाठी 16 जानेवारीला मतदान झालं होतं, तर नक्षलग्रस्त भागातल्या 162 ग्रामपंचायतींसाठी आज 20 जानेवारीला मतदान होतं आहे.

उरलेल्या ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या आहेत. पण ज्यांचे निकाल आज आले त्यांनी महाराष्ट्राचं सद्य राजकीय चित्र उभं केलं आहे. महिन्याभरापूर्वी जेव्हा विधानपरिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक झाली तेव्हा शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या त्रिकूटानं बांधलेल्या मतांच्या गणितामुळे त्यांना फायदा झाला आणि भाजपाचा तोटा झाला. पण तेव्हा निवडक मतदारांमधली ती निवडणूक होती असं म्हटलं गेलं. ही निवडणूक मात्र गावागांमध्ये पोहोचलेली होती, त्यामुळे ती अधिक महत्त्वाची ठरली.

प्रत्येक पक्षानं आपल्या विजयाचे दावे केलेले आहेत. भाजपानं सगळे निकाल पूर्ण होतील तोपर्यंत आम्ही सहा हजार ग्रामपंचायती जिंकलेल्या असतील असा दावा केलेला आहे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘भाजपच या निवडणुकीतला सर्वांत मोठा पक्ष आहे’ असं म्हटलं आहे.

दुसरीकडे ‘महाविकास आघाडी’च्या नेत्यांनीही त्यांच्या विजयाचे दावे केले आहेत. त्यातल्या बहुतांश नेत्यांनी आपापल्या जिल्हा आणि तालुक्यांचे गड राखलेले आहेत.
या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जरी गेल्या नाहीत तरीही प्रत्येक पक्षांकडून त्यांच्या विजयाचे दावे केले गेले. पण तरीही राज्यातल्या बदललेल्या समीकरणांचा फटका भाजपाला बसलेला दिसतो आहे. चंद्रकांत पाटलांच्या कोल्हापूरात भाजपाच्या वाट्याला आलेलं अपशय जरी सर्वत्र चर्चिलं जात असलं तरीही राज्याच्या अन्य भागांतही भाजपाला मागे हटावं लागलं आहे.

विशेषत: नागपूर आणि विदर्भात. तिथं काँग्रेसला यश मिळतांना पहायला मिळालं आहे. चंद्रकांत पाटलांसोबतच फडणवीस, रावसाहेब दानवे, राधाकृष्ण विखे पाटील या नेत्यांच्या भागांमध्येही भाजपाची पिछेहाट झालेली पहायला मिळते आहे. बीडमध्येही धनंजय मुंडे प्रकरणाचं सावट या निवडणुकीवर असतांनाही ‘राष्ट्रवादी काँग्रेस’नं भाजपावर कुरघोडी केली आहे.

मागच्या ग्रामपंचायतींच्या तुलनेत भाजपाची यंदा पिछेहाट झाली आहे हे दिसतंच आहे. त्यांना त्यांचं यश राखता आलं नाही. याचं मुख्य कारण मला दिसतं ते म्हणजे संरपंचपदाची थेट न झालेली निवडणूक. गेल्या वेळेस थेट निवडणुकीचा भाजपाला फायदा झाला होता. पण यंदा तसं नव्हतं. पण आता नंतरच्या स्थानिक समीकरणांमध्ये काही प्रयत्न करुन आपला संरपंच बसवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. या निवडणुकीनं भाजपचं ‘पॅन महाराष्ट्र’ स्वरुप पुन्हा एकदा स्पष्ट झालं आणि पक्षाचा झालेला विस्तारही अधोरेखित झाला.

“चंद्रपूरपासून ते उत्तर महाराष्ट्र असो की कोकण, भाजप जवळपास सगळ्या पंचायतींपर्यंत पोहोचली आहे. बाकीचे तीन पक्ष आपापल्या भागांमध्येच भक्कम असतांना त्यांच्या तुलनेत भाजपचा विस्तार झालेला दिसतो आहे. दुसरीकडे बदललेल्या समीकरणांचा ‘महाविकास आघाडी’तल्या पक्षांना फायदा झालेला पहायला मिळतो आहे. महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांचे गड राखलेले आहेत असं चित्रं आहे. काँग्रेसला एकीकडे विदर्भात यश मिळतांना दिसतं आहे, पण दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातल्या कराडसारख्या ठिकाणी अनपेक्षित निकालही त्यांना पहावा लागला आहे.

‘राष्ट्रवादी काँग्रेसनं’ही त्यांचे गड राखले आहेत. पण या सगळ्यांत शिवसेनेला मात्र फायदा होतांना पाहायला मिळाला. सर्वांत मोठा पक्ष आणि अधिक ग्रामपंचायती असणारा पक्ष बनण्यासाठी त्यांची भाजपासोबत स्पर्धा सुरू आहे. शिवसेनेचे कट्टर राजकीय विरोधक असणाऱ्या नारायण राणेंनी मात्र तळकोकणात सेनेला पराभव दाखवला आहे.

पण आकडे एकत्र केले की जसं राज्याच्या विधिमंडळात या तीनही पक्षांनी बहुमत बनवलं आहे तसं या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ‘महाविकास आघाडी’चे एकत्र आकडे मोठे आहे. पण याचा अर्थ ‘महाविकास आघाडी’ गाव स्तरापर्यंत पोहोचली असा होतो का? “असं म्हणता येणार नाही कारण इथं पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढली गेली नाही आहे आणि स्थानिक पातळीवरची समीकरणं वेगळी असतात. काही ठिकाणी तर आघाडीतले काही पक्ष भाजपाच्या गटासोबतही गेले आहेत. त्यामुळे सगळीच आघाडीची मतं एकत्र आली असं म्हणता येणार नाही. पण एकूण चित्र बघता आघाडीला फायदा झाला असं म्हणता येइल.

महाविकास आघाडी’ला फायदा झाला झाला असंच म्हणावं लागेल. ते केवळ तीनही पक्ष एकत्र आल्यानं झालं. पण संघटनात्मक ताकद असल्याचा फायदा भाजपलाही दिसतो आहे. तेच सेना आणि ‘राष्ट्रवादी’च्या बाबतीत म्हणता येईल.
महाविकास आघाडी’चं सरकार सत्तेत आल्यावर पडलेला प्रश्न असा होता की सत्तेचं हे वाटप इतर निवडणुकांमध्ये आणि स्थानिक पातळीवर कसं होणार? ते झालं तर निवडणुका जिंकता येतील का, स्थानिक कार्यकर्ते ते मान्य करतील का? पण अगोदर झालेल्या विधानपरिषद आणि आता ग्रामपंचायत निवडणुकांमधून हे समोर आलं आहे की एकत्र येऊन स्थानिक पातळीवर समीकरणं जुळवली की ‘महाविकास आघाडी’तल्या पक्षांना फायदा होतो.

आता झालेल्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरची नेत्यांची ताकद अधिक कामी आली, पण महानगरपालिकांच्या निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर लढल्या जातील. त्यामुळे जागावाटप करुन लढायच्या किंवा वेगळ्या लढून मतांची गणितं जुळवायची हे ‘महाविकास आघाडी’ला ठरवावं लागेल, पण एकत्र येऊन रणनीति ठरवल्याशिवाय ते शक्य नाही हे स्पष्ट झालं आहे. जिथं शक्य आहे तिथं ते एकत्र येतील. जिथं शक्य नाही तिथं मैत्रीपूर्ण लढती वगैरे ठरवून लढतील. पण एकत्र आल्यानं फायदा होतो, या दृष्टीने पुढील वाटचाल असेल.

गंगाधर ढवळे,नांदेड

संपादकीय
१९.०१.२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *