नांदेड – महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर ज्यांना तमाम आंबेडकरी जनता रमाई म्हणून संबोधते, या रमाईचं आयुष्य अत्यंत कष्टप्रद आणि हालाखीचं होतं. रमाईनं शेणाच्या गोवऱ्या थापून आपला उदरनिर्वाह चालविला. बाबासाहेब नावाच्या महासूर्याची ती सावली झाली म्हणूनच हा महापुरुष घडला. रमाईचं जीवन म्हणजे इतिहासाचा धगधगता पदर होय असे प्रतिपादन येथील लेखिका रमाईकार डॉ. करुणा जमदाडे यांनी केले. यावेळी साहित्यिक गंगाधर ढवळे, रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष दीपक सातोरे, आम्रपाली खाडे, सुभाष लोखंडे हे होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड मनपा माजी उपायुक्त प्रकाश येवले हे होते.
प्रज्ञा करुणा विहार देगांवचाळ येथे माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या ८६ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रमामाता आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते धूप, दीप आणि पूष्पपूजन करण्यात आले. त्यानंतर सामुदायिकरित्या त्रिसरण पंचशील ग्रहण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख व्याख्यात्या डॉ. करुणाताई जमदाडे यांनी माता रमाई यांच्या समग्र जीवन कार्यावर भाष्य केले. साहित्यिक गंगाधर ढवळे यांनी ‘तू करुणेचा महासागर, तू महान त्यागमूर्ती, अन् दुःख वेदनांची अनवट कहाणी हाय! तुझ्या जगण्याला जळण्याची झालर हाय’ ही कविता सादर करुन उपस्थितांना अंतर्मुख केले. काव्य वाचनातून रमाई मातेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना साथ देतांना कसा त्याग करुन खडतर जीवन व्यतीत केले, हे कवितेतून मांडले.
रमामाता महिला मंडळाच्या शिल्पाताई लोखंडे, निर्मलाबाई पंडीत, शोभाबाई गोडबोले, चौतराबाई चिंतोरे, रंजनाबाई वाळवंटे, पदमीनबाई गोडबोले, गोदावरीबाई लांडगे, जिजाबाई खाडे, सौ.भगिरथबाई थोरात, आशाबाई हाटकर,सौ.सुमनबाई वाघमारे, सौ.वंदनाबाई नरवाडे, गिताबाई दिपके, रमाबाई सातोरे, रमाबाई लोणे,या कार्यक्रमात सौ.आम्रपालाबाई सुनिल खाडे यांच्या वतीने खीरदान करण्यात आले. यावेळी जळबाजी थोरात, नामदेव दिपके यांची उपस्थिती होती. सुभाष लोखंडे यांनी सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन केले.

