ग्रामीण भागातील लेखकांनी महाराष्ट्राची गौरवगाथा लिहावी – कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगांवकर यांचा सल्ला ….;कौतुक माझ्या गावचं-एक दृष्टीक्षेप!’ या पुस्तकाचे थाटात प्रकाशन




नांदेड – ग्रामीण कवी लेखक हे आपल्या लेखनाची सुरुवात गाव, शिवार, शेतीमातीपासून करतात. तद्वतच नवोदित कवी दत्ताहरी कदम यांनी ‘कौतुक माझ्या गावचं- एक दृष्टिक्षेप!’ हे पुस्तक लिहून आपल्या लेखनाचा श्रीगणेशा गावापासूनच केला आहे.  त्यांनी सुरवात तर केली आहे पण असंच आपण पुढे पुढे जात राहावे.  ग्रामीण भागातील लेखकांनी आपल्या केवळ गावाचीच नव्हे तर महाराष्ट्राची गौरवगाथा लिहावी असा सल्ला येथील जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगांवकर यांनी पुस्तक प्रकाशन प्रसंगी दिला.‌

यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गावचे सरपंच प्रतिनिधी प्रकाशराव कदम सर तर प्रमुख अतिथी म्हणून  जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर यांची उपस्थिती होती, तसेच मुख्य अतिथी म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक माधवराव पाटील मातुळकर यांचे प्रतिनिधी अक्षय कदम  तसेच साहित्यिक गंगाधर ढवळे, अनुरत्न वाघमारे, आकाश प्रकाशन यु-ट्यूब चॅनेलचे संचालक पांडुरंग कोकुलवार सर,ग्रामीण कवी नागोराव डोंगरे, मातुळ येथील उपसरपंच माधव बोईनवाड, पोलीस पाटील लक्ष्मण बोईनवाड यांची उपस्थिती होती. 

“जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपी गरियसी” या विचारधारेतून लेखक नवकवी दत्ताहरी एकनाथराव कदम यांनी आपल्या मातूळ गावाचा महिमा व इत्यंभूत माहिती असलेलं आगळंवेगळं पुस्तक ‘कौतुक माझ्या गावचं-एक दृष्टीक्षेप!’ लिहलं आहे. भोकर तालुक्यातील मातुळ येथे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थित पार पडला. यावेळी सभापती बाळासाहेब रावणगांवकर बोलत होते. ते म्हणाले की,  मातुळ गावच्या विकासासाठी ६२ लक्ष रुपयांचा निधी विविध योजनेतून आला असून त्याचा गावच्या प्रतिनिधींनी विकासकामांसाठी सदुपयोग करून गावचा विकास करावा असं सांगितलं. यावेळी साहित्यिक गंगाधर ढवळे म्हणाले की, गाव आणि माणूस यांचा अनन्यसाधारण संबंध असतो. माणसाला जे नाव असतं, ते त्याच्या गावावरुनच असतं. गाव हे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, कृषिक आणि मानवी जीवनाशी निगडित सर्वच क्षेत्रांचे वैश्विक प्रतिबिंब असते. गाव या सर्वच हितसंबंधाचे केंद्रच असते. जिव्हाळ्याच्या, आपुलकीच्या, मानवतावादाच्या अभ्युपगम सौंदर्याची रचना गावाने निर्माण केलेली आहे.  गावातील सर्व मराठी महिन्यांतील सणवार, उत्सव, महापुरुषांच्या जयंत्या, निवडणका अगदी एकोप्याने आणि निकोप वातावरणात पार पडतात, ही बाब केवळ गावासाठी हितावहच नाही तर इतर अनेक गावांसाठी आदर्शवत अशीच आहे. गावात असलेल्या सार्वजनिक सुविधा, संस्था ज्या आधुनिकतेचे दर्शन घडवितात तद्वतच गावाचे आजच्या संबंधाने सुधारणा आणि गावचा सर्वोत्तम विकास ही काळाची गरज असते. 

                दरम्यान, सप्तरंग साहित्य मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने व ग्रामपंचायत कार्यालय मातुळ यांच्या वतीने लेखक दत्ताहरी कदम यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला व पुस्तक प्रकाशनासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन आणि जिजाऊ वंदनेने झाली. तसेच  साहित्य क्षेत्रातील अनुरत्न वाघमारे, नागोराव डोंगरे  इतर मान्यवरांनी दत्ताहरी पाटील यांच्या लिखाणाला शुभेच्छा दिल्या व पुढील लिखाणासाठी मार्गदर्शन करण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद कदम तर आभार एकनाथ कदम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश बालाजीराव पाटील, अशोक जाधव, नामदेव कदरवाड सर, ओमप्रकाश कदम, रमेश मुकुटवार, माधव कदम,बाबुराव तमलवाड, बालाजी टोपलवाड आदी व मातुळ ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *