खरीप हंगाम २०२१ प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग नोंदवा कृषी विभागाचे आवाहन

खरीप हंगाम २०२१ मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम दिनांक १५ जुलै २०२१ आहे. शेतकरी आपला विमा प्रस्ताव आपले सरकार सेवा केंद्र, सहकारी संस्था, वैयक्तिक ऑनलाईन अर्जाद्वारे ,केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर www.pmfby.gov.in किंवा इफको-टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीच्या नजीकच्या कार्यालयात विमा प्रस्ताव सादर करावा असे आवाहन कंधार कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी केले.

सदर विमा प्रस्तावासोबत शेतकऱ्यांनी आपल्या बचत खात्याच्या पासबुकची प्रत,आधार कार्ड, पिक पेरा, ७/१२ ची प्रत इत्यादी कागदपत्रे सादर करावीत.सदर विमा प्रस्ताव सादर करीत असताना शेतकऱ्यांनी विमा हप्त्याची रक्कम सोडून इतर कोणतेही शुल्क अदा करू नये.

योजनेत तूर,मूग, उडीद, ज्वारी, सोयाबीन, कापूस ही पिके समाविष्ट आहेत.

या योजनेची वैशिष्ट्ये नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांसारख्या अकल्पीत प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे अशी आहेत.

विम्यासाठी पात्र शेतकरी

अधिसूचित क्षेत्रातील,अधिसूचित पिकांचे उत्पादन घेणारे कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी.

खरीप हंगामातील अधिसूचित पिकांसाठी जोखमीच्या बाबी अश्या आहेत.

हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान. हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान. पीक पेरणीपासून काढणीपर्यंत या कालावधीमध्ये नैसर्गिक आग,वीज कोसळणे,गारपीट,वादळ ,चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे,भूस्खलन,दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पादनात येणारी घट,स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्‍चात नुकसान.
विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत इफ्को-टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीचा टोल फ्री क्रमांक १८००-१०३-५४९० वर कळविणे आवश्यक राहील.

इफ्को-टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड वेबसाईट www.iffcotokio.co.in, कॉल सेंटर १८००-१०३-५४९०,  ई-मेल support [email protected] असा आहे. पिक विमा दर २ टक्के तर नगदी पिकांसाठी विमा हप्ता दर ५ टक्के आहे.

तूर पिकासाठी  विमा संरक्षित रक्कम ३५००० रू. शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता ७०९ रु., मुग , उडीद पिकासाठी विमा संरक्षित रक्कम २०००० रू.शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता ४०० रु., ज्वारी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम २५००० रू. शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता ५०० रु.,कापूस पिकासाठी विमा संरक्षित रक्कम ४५००० रू. शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता रक्कम २२५० रू. सोयाबीन पिकासाठी विमा संरक्षित रक्कम ४५००० रू. शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता ९०० रुपये असा आहे.अशी माहीती कंधार तालुका कृषी आधिकारी रमेश देशमुख यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *