राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० चे अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाची पळवाट.

फुलवळ ब ( धोंडीबा बोरगावे )

नांदेड ते उस्माननगर – फुलवळ मार्गे उदगीर जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० चे फुलवळ येथे अर्धवट काम करून संबंधित मे. कलथीया एजन्सी गायब झाली असून सदर रस्त्यावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असतानाच उर्वरित अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी ग्राम पंचायत व ग्रामस्थांनी सदर रस्त्यावरील अतिक्रमण व विद्युत डेपो हटवून काम पूर्ण करण्यास सहकार्य करावे असे राष्ट्रीय महामार्ग विभागाने ग्राम पंचायत ला पत्र व्यवहार करून केवळ पळवाट काढली असल्याने यापूर्वी कामात अडथळा होतोय म्हणून पाडलेली घरे , ताब्यात घेतलेल्या जागा यावर काय ग्राम पंचायतनेच कार्यवाही केली होती का ? असा सवाल ग्रामस्थांतून उपस्थित करत संबंधित विभाग केवळ झोपेचं सोंग घेत त्या कलथीया एजन्सीची पाठराखण करत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

फुलवळ येथील राष्ट्रीय महामार्ग चे अर्धवट राहिलेले काम तात्काळ पूर्ण करावे यासंदर्भात ग्राम पंचायतच्या वतीने संबंधित विभागाला ता . १९ सप्टेंबर २०२१ रोजी पत्र पाठवले होते. त्याचे कारण असे होते की

फुलवळ बस स्थानक शेजारी जांब व मुखेड जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाय पॉईंट तयार झाला असून त्या ठिकाणचे वळण हे अत्यंत धोकादायक बनले आहे.

त्यामुळे दिवसेंदिवस छोट्या मोठ्या अपघातांची संख्या वाढत असून कधी कोणाचा जीव जाईल हे सांगणे जरी कठीण असले तरी वाढत्या वाहतुकीचा विचार करता सावधानता बाळगणे ही तेवढेच महत्त्वाचे आहे.

फुलवळ ग्राम पंचायत ने राष्ट्रीय महामार्ग विभागाला पाठवलेल्या त्या पत्राच्या आधारे तब्बल दोन महिन्यानंतर ता. २३ नोव्हेंबर २०२१ रोजी संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने फुलवळ ग्राम पंचायत ला पाठवलेल्या पत्रात ग्राम पंचायत ने केलेल्या मागणीचा संदर्भ देत ते अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी ग्राम पंचायत व ग्रामस्थांनी मिळून रस्त्यालगतचे अतिक्रमण व विद्युत डेपो हटवण्यासाठी सहकार्य करावे असे मत मांडून पळवाट काढली आहे.

एवढेच नाही तर त्या पत्रात असाही उल्लेख आहे की या केंद्रशासनाच्या रस्त्याचे काम प्रगती पथावर असून या रस्त्याची रुंदी १०० फूट असून सदर रस्त्याच्या दोन्ही बाजूने सर्व्हिस रस्ते व आर सी सी नाली सुद्धा दोन्ही बाजुंनी करणे अनिवार्य आहे . त्यासाठी रस्त्या लगत असलेले हॉटेल्स , दुकाने व अन्य अतिक्रमण हटवन्यासाठी व तो विद्युत डेपो काढण्यासाठी आपण सहकार्य करावे असाही स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे सदर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रस्ता नक्कीच होणार यात शंकाच नसून नाली सुद्धा होणार हे स्पष्ट झाले आहे.

३ डिसेंबर रोजी ग्राम पंचायत ने आयोजित केलेल्या ग्राम सभेत राष्ट्रीय महामार्ग विभागाने पाठवलेल्या पत्राचा उल्लेख होऊन या विषयावर चर्चा झाली असता अनेकजण आश्चर्यचकितच झाले . कारण यापूर्वी याच रस्त्याचे एका बाजूचे काम पूर्ण करण्यासाठी अनेकांची घरे पाडली गेली , अनेकांच्या रिकाम्या जागा ताब्यात घेण्यात आल्या. मग त्यावेळी याच विभागाने किंवा त्या ठेकेदाराने ग्राम पंचायत ला विचारूनच ती कार्यवाही केली होती का ? मग आताच का ग्राम पंचायत ने पुढाकार घ्यावा असे वाटत आहे ? असे अनेक प्रश्न अनेकांनी उपस्थित करत कुठंतरी नक्कीच पाणी मुरतंय हे ओळखून सोडल असून खरच जर राष्ट्रीय महामार्ग चे काम पूर्ण व्हावे असे वाटत असेल तर त्या त्या अधिकाऱ्यांनी व त्या एजन्सी च्या ठेकेदाराने प्रत्यक्ष भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा करून कामाला सुरुवात करावी आणि जर कोणी अडवणूक करत असेल तर पोलीस बंदोबस्त वापरून काम पूर्ण करावे परंतु केवळ पळवाट काढण्यासाठी असे पत्र पाठवून वेळ मारून नेऊ नये कारण अपघात सदृश परिस्थिती निर्माण झालेल्या वळणाच्या ठिकाणी जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत असल्याच्या भावना अनेकांनी बोलून दाखवत तात्काळ अर्धवट काम पूर्ण करावे अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

l

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *