माझ्या मायबोलीचा गौरव

 

आज मराठी राजभाषा दिन /मराठी भाषा गौरव दिन तेव्हा जगातील सर्व मराठी बोलणाऱ्या, मराठी भाषा जाणणाऱ्या माझ्या तमाम बंधू-भगिनींना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

दिनांक 27 फेब्रुवारी रोजी मराठीतील प्रख्यात कवी नाटककार कादंबरीकार लेखक कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस.

27 फेब्रुवारी म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस दरवर्षी मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. दिनांक 27 फेब्रुवारी 1922 या दिवशी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म महाराष्ट्राच्या भूमीत झाला त्यांनी आपल्या असामान्य प्रतिभा आणि विलक्षण लेखन कौशल्य आणि शब्द सामर्थ्याच्या जोरावर मराठी भाषेतून साहित्याची निर्मिती केली.

 

अनेक सरस कथा कादंबऱ्या निबंध लघुकथा नाटक कविता इत्यादीं यांचे कुसुमाग्रजांनी कुशल असे लेखन केले.नटसम्राट सारखे अजरामर नाटक त्यांच्या असामान्य प्रतिभेची ओळख पटवून देते तर कुसुमाग्रजांचे विशाखा हे काव्यसंग्रह भारतातील साहित्यातील त्यांचे उत्कृष्ट कार्य व आधुनिक मराठी काव्याचे कायमची भूषण ठरले आहे.

त्यांच्या याच विशाखा काव्यसंग्रह आणि मराठी भाषेला दुसरा ज्ञानपीठ मिळवून दिला.
मराठी भाषेला पहिला ज्ञानपीठ मिळवून देणारे महान साहित्यिक त्यांनी कुसुमाग्रज यांना मानवतेचे कवी म्हटले आहे.
या महान साहित्यिकाने मराठी भाषेच्या प्रतिष्ठेत जी भर घातली त्याचप्रमाणे त्यांच्या महाराष्ट्रातील सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान व मराठी भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांमुळे त्यांना अभिवादन म्हणून 21 जानेवारी 2013 पासून शासन निर्णयानुसार 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित करण्यात आला.

 

मराठी सर्वांग सुंदर भाषा आहे.भारतातील बावीस अधिकृत भाषांपैकी मराठी भाषा ही एक भाषा आहे. महाराष्ट्र तसेच गोवा या दोन राज्याची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे.
तसेच मराठी भाषा भारतामध्ये सर्वात जास्त बोलणाऱ्या भाषांपैकी तिसरी भाषा आहे.
मराठी भाषा ही अमृतालाही पैजेणे जिंकणारी आहे. तिचा गोडवा अमृता पेक्षा अधिक आहे. मराठी भाषेला फार मोठी परंपरा लाभलेली आहे मराठी भाषा ही मराठी माणसाची लाडकी मायबोली भाषा आहे.
देववाणी संस्कृत भाषा ही मराठी भाषेची महामाय म्हणून ओळखली जाते.मराठी भाषेतील आद्य ग्रंथ म्हणून मुकुंदराजा विवेकसिंधु हा ग्रंथ आपल्याला पाहावयास मिळतो.
मराठी भाषेला अधिक संपन्न बनवण्याकरिता अनेक संत कवी साहित्यिकांनी अथक असे परिश्रम घेतले. मराठी भाषा ही अनेक संतांच्या किर्तन आणि भारुड,ओव्यांनी, भजनाने सजलेली आहे. ती अनेक मराठी साहित्यिकांच्या प्रतिभासंपन्न अशा लेखणीने समृद्ध संपन्न झालेली आहे.
सावतामाळी नरहरी,सोनार संत नामदेव, संत तुकाराम संत ज्ञानेश्वर, गोरोबा कुंभार या सारख्या संतांनी मराठी भाषेला जिवंत ठेवले.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठी भाषेला परकीय आक्रमणापासून वाचवले व मराठी भाषेला अधिक संपन्न शुद्ध केले. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेनंतर मराठी भाषेचे शुद्धीकरण करून मराठी भाषेचा शब्दकोश तयार करून घेतला होता.
आणि कुसुमाग्रज मंगेश पाडगावकर, पु. ल देशपांडे अशा साहित्यिकांनी मराठी भाषेला वाढवण्याचे काम केले. त्याच मराठी भाषेचा गौरव दिन आज आपण साजरा करीत आहोत.
मराठी भाषा 1960 पासून राजभाषा झाली. तेव्हापासून सर्व व्यवहार मराठी भाषेतून चालू लागला. आज मराठी भाषिक लोक संपूर्ण जगामध्ये पसरलेले आहे. जगामध्ये सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये मराठी भाषा ही दहाव्या क्रमांकावर आहे.
परंतु असे असतानाही अनेकदा मराठी भाषेच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त व्यक्त केली जाते.परंतु,आपण चिंता व्यक्त करत बसण्यापेक्षा मराठी भाषेचा विकास कसा करता येईल याकडे लक्ष द्यायला पाहिजे.आपल्या पूर्वजांनी मराठी भाषेचा संपन्न वारसा आपल्याला दिला आहे. त्याचे आपण जतन केले पाहिजे.

 

यासाठी आपण सर्वांनी मराठी भाषेचा, शिक्षणाचा सन्मान केला पाहिजे. मराठी लेखन वाचन केले पाहिजे. तसेच मराठीतील ग्रंथ विकत घेऊन वाचले पाहिजे. दैनंदिन जीवनात तसेच आजच्या इंटरनेट युगात,समाज माध्यमावर मोठ्याप्रमाणावर मराठी भाषेचा उपयोग करूया.मराठी भाषेच्या जास्तीत जास्त उपयोग करून संपूर्ण जगात मराठी भाषेचा झेंडा रोवून, मराठी भाषेचा सन्मान हाच आपला सन्मान मराठी भाषेला अजरामर बनवूया.

रूचिरा बेटकर, नांदेड.
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *