@ साहित्यिक रत्न – अण्णाभाऊ साठे

 

आपल्या भारत देशामध्ये अनेक समाजसुधारक होऊन गेले. अशाच समाजसुधारकांपैकी एक म्हणजे अण्णाभाऊ साठे होय. अण्णाभाऊ साठे हे समाजसुधारका बरोबरच उत्तम असे साहित्यकार, कवी, लेखक, कादंबरीकार, लावणीकार आणि पोवाडेकार होते. आश्या वेगवेगळ्या साहित्य प्रकारांत त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे.

आपण जरी त्यांना अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखत असलो तरी अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण नाव ” तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे” असे आहे.
ब्रिटिश राज्यकर्त्याने ‘गुन्हेगार’ म्हणून असा शिक्का मारलेल्या एका जमातीत त्यांचा जन्म झाला. म्हणजेच अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्या मध्यील वाटेगाव या लहानश्या गावामध्ये झाला. अण्णाभाऊ भाऊ साठे यांचे शालेय शिक्षण पूर्ण नसताना सुद्धा त्यांना पूर्णतः अक्षर ज्ञान प्राप्त करून घेतले.

अण्णाभाऊ साठे महाराष्ट्रातील एक शाहीर म्हणून परिचित असले तरी यांनी आपल्या जीवन प्रवासामध्ये अनेक कथा, कादंबऱ्या, नाट्य, लोकनाट्य, चित्रपट, लावण्या, गवळण, प्रवास वर्णन असे वेगवेगळे साहित्य प्रकार अतिशय उत्कृष्टपणे हाताळून
सशक्त आणि समृद्ध केले.

‘तमाशा’ या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय अण्णाभाऊ साठे यांनाच जाते. यांनी आपल्या प्रत्येक साहित्यातून जनजागृती करण्यासाठी प्रयत्न केला. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यरचनाचा वापर त्यांनी कष्टकरी लोकांचे जीवन सुधारण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी केला.
स्वतंत्रपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात देखील अण्णाभाऊ साठे यांनी राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्र राज्यात पूर्णता जनजागृती केली. भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अण्णाभाऊ साठे यांचा महत्त्वाचा वाटा होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती संग्राम यांसारख्या आंदोलनांमध्ये त्यांनी आपले सहकार्य दाखवले.
1944 ला अण्णाभाऊ साठे यांनी “लाल बावटा” या नावाचे पथक स्थापन केले. बघता बघता त्यांचे हे पथक संपूर्ण देशभरात पसरले. अण्णाभाऊ साठे यांची अनेक लावण्या आणि चित्रपट खूप प्रसिद्ध झालेत त्यातील काही लावण्या म्हणजे ‘ माझी मैना गावाकडे राहिली’ आणि ‘ माझ्या जीवाची होतीय काह्यली’ या प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लावण्या आहेत.

अण्णाभाऊ साठे यानी चरित्र देखिल लिहिले त्यातील प्रसिद्ध झालेले चरित्र म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र होय. शिवाजी महाराजांचे चरित्र त्यांनी रशियन भाषेमध्ये भाषांतर केले. यासाठी त्यांना पुढे राष्ट्र अध्यक्षांकडून सन्मान देखील मिळवला.
16 ऑगस्ट 1947 रोजी म्हणजेच देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांनी “यह आजादी झुठी है। देश की जनता भुखी है । ” हा नारा दिला होता. त्यावेळी पावसाने अक्राळविक्राळ रूप धारण केले होते तरीसुद्धा अण्णाभाऊ साठे… या पावसाला न घाबरता शिवाजी पार्कवर हा नारा देत उभे राहिले.

त्यांनी आपल्या अल्पायुषामध्ये 21 ग्रंथ संग्रह आणि 30 पेक्षा अधिक कादंबरीची रचना केली. त्यांनी लिहिलेल्या सातपेक्षा अधिक कादंबऱ्यांवर मराठी चित्रपट देखील काढलेले आहेत. तर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या “फकीरा” या कादंबरीला 1961 ला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आणि मराठी साहित्यामध्ये आपले महत्त्वाचे योगदान देणारे वि. स. खांडेकर यांनी देखील या कादंबरीचे कौतुक केले.
अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या फकीरा या कादंबरीमध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिश राज्यकर्त्यांचे खनिजे, अन्नधान्य, संपत्ती लूटून आपल्या देशातील गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकीरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण केलेले आहे.
तर “वैजयंता” या कादंबरीमध्ये अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेल्या प्रथमताच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केलेले आहे.
तसेच त्यांनी लिहिलेल्या “माकडाची माळ” या कादंबरीमध्ये भटक्या विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म असे चित्रण केलेले आहेत. घरगडी, कोळसेवाला, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजूर अशा विविध रचना अण्णाभाऊ साठे यांनी रंगविल्या.

 

अण्णाभाऊ साठे मराठी साहित्याला लाभणारे खरोखरच एक अनमोल असे रत्न होते. तसेच त्यांची निरीक्षण शक्ती देखील अतिशय सूक्ष्म होती. त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांनी केलेल्या लेखनशैलीला मराठमोळ, रांगडा आणि लोभस घट आहे असे म्हटले जाते. म्हणूनच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सारखे आता कोणी ही होणे नाही.
आपणास व आपल्या कार्यास कोटी कोटी प्रणाम.

सौ.रूचिरा बेटकर नांदेड.
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *