माणसांच्या सुख दुःखाला सावरणारं माध्यम म्हणजे कला. याच कलेने अनेक वळणं घेतली, आकार घेतला, विशाल रूपं घेत समुद्राचं स्वरूप धारण करत मानवी मनाला सहिष्णू करण्याचं काम केले आहे. तीच कला वेगवेगळ्या प्रकारात सादर केली जात आहे. याच कलेचे उपासक डॉ. राजू सोनवणे रंगभूमीचं ‘जागरण’ लोककलेच्या माध्यमातून घालत आहेत.
राजू सोनवणे यांचे मूळ गाव सारोळा ता. कन्नड जि. छत्रपती संभाजी नगर. त्यांचे आजोबा भाऊराव सोनवणे हे डोळ्यांनी अंध होते; पण त्यांना सूरांची समज होती. ते संबळ पार्टीत कधी तुतारी तर कधी संबळ वाजवत. उरलेल्या वेळात ते करमणूक म्हणून घरी मिळेल त्या साधनांचा वाद्यासारखा वापर करत. निळावंती आणि लालवंतीच्या कथा आख्यानासारखे सांगत. तेच सूर, ताल आणि कथेतील नाट्य ऐकत राजू सोनवणे वाढत होते.डॉ. सोनवणे यांचे वडील दगडूजी सोनवणे हे तत्कालीन मॅट्रिक पास होते. त्यामुळे त्यांना आरोग्य सेवक (मलेरिया डॉक्टर) म्हणून नोकरी मिळाली. ते हिंगोली जिल्ह्यातील नर्सी नामदेव या गावाजवळील पुसेगाव येथे रुजू झाले. तर आई यावेळी डी. एड्. करत होत्या.
डॉ. सोनवणे यांचे वडील पुसेगावातील मंदिरात भजनाला जात असत. त्यावेळी त्यांच्या सोबत राजू सोनवणे हेही जात. बालपणीच संगीताचे स्वर आणि सूर त्यांच्या मनात शिरले. त्यांनाही आपण काही तरी करावे असे वाटत. सोनवणे यांचे प्राथमिक शिक्षण पुसेगाव येथेच झाले. नंतर आई नोकरीला लागली. चिंचोली लिंबाजी येथे त्या शिक्षक म्हणून कार्यरत झाल्या. त्याच दरम्यान वडिलांचीही चिंचोली येथेच बदली झाली.
दरम्यानच्या काळात दरवर्षी गणेशोत्सवात कलाकारांचे मेळे भरवले जात होते. त्यात माजी मंत्री अशोकराव पाटील डोनगावकर, प्रख्यात कलावंत डॉ. लक्ष्मण देशपांडे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, प्राध्यापक त्र्यंबक महाजन अशी मातब्बर मंडळी या मेळ्यांचे नेतृत्व करत. त्यावेळी वेगवेगळी बाल गणेश मेळे आपली कला सादर करत. त्यांचा बक्षिसांच्या रूपाने मान सन्मान केला जात. या मेळ्यात कलावंत म्हणून डॉ. सोनवणे यांना संधी मिळाली. गावातील शिवशक्ती बाल गणेश मेळ्यात त्यांना संधी मिळाली. त्यांचे पहिले डायरेक्टर होते सोनाजी बापू गडपे. तो काळ अक्षरशः सोनवणे यांनी सोन्याचा केला.
प्रत्येक भूमिका जीव लावून केली. त्यांच्या गावात देवीची जत्रा भरते. यात अनेक लोकनाट्य तमाशे येत. सोबतच गावातील कलावंतही आपली कला सादर करत. गावात ग्रामीण नाटकाची ही परंपरा फार जुनी आहे. एका ग्रामीण नाटकात सोनवणे यांना स्त्रीपात्राची भूमिका मिळाली… हे त्यांचं पहिलं नाटक. त्या नाटकाचं नाव होतं ‘कलीचा संचार’. अशा सांस्कृतिक वातावरणात सोनवणे यांच्यातलं कलेचं रोपटे आकार घेऊ लागले.
दहावी पास झाल्यानंतर ते शिक्षणासाठी छत्रपती संभाजी नगर येथील सरस्वती भुवन कॉलेजला आले. अकरावी सायन्सला प्रवेश घेतला. तेथील हॉस्टेलवर राहत असताना त्यांनी तिथे डॉ. दिलीप घारे, यशवंत देशमुख यांचे ‘गाजराची पुंगी’ हे नाटक बघितले. नाटक कसे सादर केले जाते, याचे नकळतच शिक्षण मिळाले. गावातील ओबडधोबड कला तंत्रशुद्ध प्रशिक्षणाने कशी उजळली जाते, हे त्यांना बघायला मिळाले.
१९९० साली लोककलावंत विश्वास साळुंके यांनी कामगार कल्याण मंडळाच्या वतीने नाट्य प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात सोनवणे सहभागी झाले. या दहा दिवसांनी त्यांच्यातल्या कलाकाराला वाट मोकळी करून दिली. या शिबिरात अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांचं मार्गदर्शन सोनवणे यांच्यासाठी महत्त्वाचे ठरले.
बारावीच्या नंतर ते कला शाखेत प्रवेशित झाले. तिथे बी. ए. लाच नाट्यशास्त्र विषय होता. त्यामुळे अभ्यासक्रमाचा भाग म्हणून ते ‘ड्रामा’ करत राहिले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत सराफ, राजू पाटोदकर, नंदू काळे, मकरंद अनासपुरे हे मित्र भेटले. त्यांच्या सोबत ‘रंगकर्मी’ या नावाने त्यांनी अनेक पथनाट्याचे प्रयोग सुरू केले. लोककलावंत शाहीर विश्वास साळुंके यांच्या बरोबरही काही प्रयोग केले.
महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त अंकुशराव कदम यांनी सोनवणे यांना संस्थेत रिसेप्शन विभागात टेलीफोन ऑपरेटरची नोकरी दिली. नंतर ते काही काळ मुंबईत कला नगरीत गेले, पण ते तिथे रमले नाहीत. त्यांनाही मुंबईने आपलसं केलं नाही. ते परत छत्रपती संभाजीनगर येथे आले. मग त्यांनी नाटकांचे प्रयोग केले. त्यात ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाचे साठपेक्षा अधिक प्रयोग केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात त्यांनी प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांना डॉ. लक्ष्मण देशपांडे, डॉ. शशिकांत बऱ्हाणपूर, डॉ. रुस्तुम अचलखांब, डॉ. कुमार देशमुख, प्रा. अलोक चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. सोबतच प्रसिद्ध सिने अभिनेते मकरंद अनासपुरे, ज्ञानेश्वर उंडणगावकर, गजेंद्र बिराजदार हे सवंगडी मिळत गेले. मराठवाड्यातील अनेक एकांकिका स्पर्धेत ते सहभागी होऊ लागले. हिंगोली येथील ‘बेंडे’, परभणीची ‘वरपुडकर’ आणि छत्रपती संभाजीनगरातील ‘जाणिवा’ या स्पर्धेत त्यांनी कलेची चमक दाखवली. यावेळी ते कबीर मठात राहू लागले. तिथे त्यांना महंत शांतीदास यांचे मार्गदर्शन भेटले. तेही कलेचे उपासक होते. ‘जाणिवा’च्या एकांकिका स्पर्धेत सोनवणे लिखित ‘जागरण’ या एकांकिकेला सर्व प्रकारातील बक्षिसे मिळाली. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला.९९-२००० साली त्यांनी सिने लेखक अरविंद जगताप यांच्या सोबत ‘वारी दर शनिवारी’ हा नाटकाच्या संदर्भाने उपक्रम सुरू केला. यात वेगवेगळे प्रयोग सादर केले. या वारी उपक्रमात प्रसिद्ध सिने अभिनेते संदीप पाठक, सुधीर निकम, राकेश सोनार यांच्यासह काही कलावंत होती. नंतर एमजीएममध्ये नाट्यशास्त्र विभाग सुरू झाला. तिथे सोनवणे हे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत झाले. मग त्यांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन अनेक एकांकिका स्पर्धा गाजवल्या. मानाच्या सकाळ करंडकासह काही स्पर्धा गाजवल्या आणि जिंकल्याही. त्यांनी काही विद्यापीठांच्या युवक महोत्सवात परीक्षक म्हणून काम केले आहे.
‘ आमचं कोण पहाणार?’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘जागरण’, ‘बुरगुंडा’ ‘समथिंग मिसिंग’, ‘शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण’ यासारखी अनेक नाटके आपल्या सृजनशील कलेनी गाजवली. त्यांच्यात अभिनेता, लेखक तर मोठा आहेच. शिवाय आत दडलेला अफलातून दिग्दर्शकही आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते थेट नाट्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्या दिग्दर्शनात कलेची समज दिली आहे. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता आला.
लोककला हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. लोककलेला नव्या पद्धतीने सादर करण्याचा ते प्रयत्न करत. कैलास टापरे, जगन्नाथ पाखरे, शोभा दांडगे, ज्ञानेश्वर उंडणगावकर हे एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी येत. पाखरे मामाची ढोलकी टण टण करू लागली की, खिशातून टोपी काढत डोक्यावर चढवायची. मफलरला झटका देऊन ढोलकीच्या थापेसोबत त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडत. तिथेच बतावणी, प्रहसन सुरू होत. लोक हसत हसत विचार करू लागत. त्यावेळी त्यांचे टायमिंग अफलातून असत. जे कोणत्याही लोककलावंतांकडे ऐनवेळी सादर करण्याची कला डॉ. सोनवणे यांनी कमावलेली आहे. तीच फार जमेची आहे.नव्या तंत्रज्ञानाच्या युगात नाटकाचा रसिक कमी होत गेला. कारण टी. व्ही., मोबाईलमुळे प्रत्येकाच्या खिशात शेकडो चॅनल विराजमान झाली. तरीही नाटक हा कला प्रकार रसिकांच्या मनात रहावा यासाठी त्यांनी ‘नाटक आपल्या घरी’ हा उपक्रम घरोघरी जाऊन केला.
डॉ. सोनवणे यांनी निलेश खराबे दिग्दर्शित ‘बम चिकी चिकी बम’ मकरंद अनासपुरे निर्मित आणि दिग्दर्शित ‘राजकारण गेलं मिशीत’, ‘मूषक आख्यान’ या चित्रपटात प्रभावी भूमिका साकारल्या आहेत.
सध्या ते एमजीएम विद्यापिठात नाट्य व संगीत विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या दिग्दर्शन आणि मार्गदर्शनातून समाजाला चांगले कलावंत मिळतील, याची खात्री आहेच. कारण त्यांच्यातला एक सरळमार्गी माणूस मी गेली दोन दशके अनुभवत आहे. कधी कुणाची कुटाळकी नाही, असूया नाही. ‘जसे आहोत तसेच राहू’ ही त्यांची जगण्याची पद्धत आहे. ‘चांगले स्वीकारणं आणि नको ते जाग्यावरच सोडून देणे’ हा त्यांचा स्वभाव मला खूप आवडतो.वैजनाथ वाघमारे
शब्दवेध बुक हाऊस (प्रकाशन)
छत्रपती संभाजी नगर
मो – 8637785963/7758941621

