नांदेडात अशी घटना का घडली?

नांदेडमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी 4 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानं होळीनंतर निघणाऱ्या शिख समाजाच्या होला मोहल्ला मिरवणुकीला परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र, काही भाविकांनी पोलिसांनी केलेली बॅरिकेडिंग तोडली आणि पोलिसांशी झटापट केली. यामुळे या भागात तणाव निर्माण झाला होता. नांदेडमधल्या सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराच्या परिसरात ही घटना घडली. जमावाने केलेल्या हल्ल्यात 4 पोलीस जखमी झाल्याचं नांदेडचे पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सांगितलं.

“वाढत्या कोव्हिड रुग्णांच्या संख्येमुळे यंदा होला-मोहाल्ला परवानगी नाकारली होती. त्याबाबत गुरुद्वारा प्रंबंधक समितीला सूचनाही केली होती. तेव्हा त्यांनी हा कार्यक्रम गुरुद्वारामध्येच आयोजित करू असं आश्वासन दिलं होतं. पण सोमवारी सायंकाळी 4 वाजल्यानंतर निशान साहिब गुरुद्वाराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आणलं, तेव्हा 300 ते 400 तरूणांच्या जमावाने बॅरिकेड्स तोडले. यंदा होला-मोहल्ला कार्यक्रम गुरुद्वारामध्ये आयोजित करायचं ठरलं होतं, असं, श्री हजूर साहिब गुरुद्वारा प्रबंधक समितीचं म्हणणं आहे.

सध्या नांदेडमध्ये लॉकडाऊन आहे. त्यामुळे आम्ही होला-मोहाल्ला कार्यक्रम गुरुद्वारामध्ये आयोजित केला होता. यात मिरवणुकीचा कोणताही प्लान नव्हता. तसं आम्ही सगळ्यांना सूचनाही दिलेल्या. तशी वरिष्ठांनी वारंवार विनंतीही केली होती. पण कार्यक्रमासाठी आलेल्या तरुण वर्गाने मात्र गुरुद्वारामधली वरिष्ठ व्यक्तींचं ऐकलं नाही. निशान साहिब जसा प्रवेशद्वारासमोर आला तसं त्यांनी बॅरिकेड्स तोडले आणि महावीर चौकाकडे धाव घेतली.

होला मोहल्ला कार्यक्रमास शीख धर्मियांमध्ये विशेष महत्त्व आहे. नांदेडमधली होला-मोहाल्ला मिरवणूक पाहण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातून लोक येत असतात. कोरोना काळात सर्वत्र जमावबंदी असताना इतके लोक एकत्र कसे आले आणि त्यानंतर पोलिसांवर हल्ला का झाला हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

नांदेडच्या गुरुद्वारा कमिटीने पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. “होला मोहल्लाचा कार्यक्रम सार्वजनिक स्वरूपात करू नये, अशी सूचना गुरुद्वारा कमिटीने दिलेली असतानाही काही अतिउत्साही तरुणांनी हा प्रकार घडवून आणला.‌ होला मोहल्ला कार्यक्रमादरम्यान गोंधळ कसा झाला, याबद्दल नांदेडचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सांगितले की “29 मार्च रोजी हल्लाबोल कार्यक्रमावेळी निशाण साहेब (शीख धर्मियांचा झेंडा) गेट नंबर एक जवळ आलं. निशाण साहेब बाहेर काढण्यावरून वाद निर्माण झाला. साधारणतः 300 ते 400 तरुण यावेळी उपस्थित होते.” त्यातल्या काही तरुणांनी गोंधळ केला आणि बॅरिकेड्स तोडले. त्यात 4 पोलीस जखमी झाले. जमावाकडून वाहनांचे नुकसान देखील झाले असल्याची माहिती शेवाळे यांनी दिली.

सोशल मीडियावर काही व्हीडिओ फिरत आहेत त्यामध्ये काही तरुण तोडफोड करताना दिसत आहेत. 29 मार्चच्या घटनेनंतर मारहाण करणाऱ्या, तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नांदेडला शीख धर्मियांची ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखले जाते. देश-विदेशातूनही अनेक लोक या कार्यक्रमासाठी येत असतात. हा कार्यक्रम नेहमी शांतताप्रिय पद्धतीनेच पार पडतो. पण यावेळी जे घडलं ते निंदनीय आहे, असं वक्तव्य नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी केलं आहे. अशा प्रकारचे वर्तन करणाऱ्यांवर वेळीच नियंत्रण आणले पाहिजे ,अशी भूमिका चिखलीकर यांनी मांडली. नांदेड जिल्ह्यासाठी पुरेशी पोलीस यंत्रणा उपलब्ध असताना असा प्रकार का घडला याची शहानिशा व्हायला हवी असं चिखलीकर म्हणाले. तर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात सावध प्रतिक्रिया दिली आहे. चौकशी करुन दोषींवर कारवाई केली जाईल असे ते म्हणाले आहेत.

नांदेड गुरुद्वाऱ्याच्या इतिहासात अशी घटना प्रथमच घडली असल्याचं हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी म्हटलं आहे. शेळीच्या कळपाचे नेतृत्व सिंहाने केले तर ते विजयी होऊ शकतात. पण सिंहांच्या कळपाचे नेतृत्व जर शेळीने केले तर तो कळप पराभूत होऊ शकतो. दुर्दैवाने असे म्हणावे लागेल की पोलीस यंत्रणा कुचकामी ठरली. या घटनेसाठी ग्राउंडवर काम करणारे पोलीस जबाबदार नाहीत तर त्यांचे नेतृत्व करणारे वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत.” कालच्या कार्यक्रमामध्ये जो असंतोष दिसला, त्याला दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची पार्श्वभूमी आहे, असंही हेमंत पाटील म्हणाले आहेत.

“कालच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येनी हरियाणा आणि पंजाबमधून लोक आले होते. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत आणि त्यांचा रोष केंद्र सरकारवर आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी सीमेवर बसून आंदोलन करत आहेत पण केंद्र सरकार त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्याच गोष्टीचा असंतोष कालच्या घटनेत दिसला,” असे पाटील यांनी म्हटले आहे.

नांदेडच्या घटनेशी शेतकरी आंदोलनाचा संबंध असण्याची शक्यता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी फेटाळून लावली आहे. तर नुकताच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पोलिसांना टार्गेट दिले जातात असा आरोप केला होता याकडे उपाध्ये यांनी लक्ष वेधले. ते सांगतात, “मुळात पोलिसांचे मनोधैर्य खचले आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पोलिसांना बेसुमार टार्गेट दिले जात आहे त्यामुळे ते पूर्ण क्षमतेनी काम करू शकत नसल्याचे नांदेडच्या घटनेतून दिसून आले आहे. पोलिसांचे मनोबल पुन्हा वाढेल अशा उपाय योजना करण्याची गरज आहे.”

हल्ला बोल कार्यक्रम शस्त्रकलेच्या प्रदर्शनासाठी प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमाला साडेतीनशे वर्षांची परंपरा आहे. होला मोहल्लाची सुरुवात शिखांचे दहावे गुरु श्री गुरू गोविंद सिंह यांनी केली होती, अशी माहिती अमृतसर विद्यापीठातील गुरू ग्रंथ साहेब अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. अमरजीत सिंग यांनी दिली. ते सांगतात, “लोकांमध्ये साहसी वृत्ती निर्माण व्हावी या हेतूने श्री गुरू गोविंद सिंह यांनी होला मोहल्लाची सुरुवात केली. होळी सणाचं स्वरूप केवळ रंग खेळण्यापुरतंच मर्यादित झालं होतं.”

“त्यामुळे गुरू गोविंद सिंह यांनी होळीच्या दुसऱ्या दिवशी शस्त्रकलेच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्याची परंपरा सुरू केली. त्यांनी सुरू केलेल्या खालसा पंथाच्या तत्त्वावरच होला मोहल्ला आधारित होता. खालसा पंथातील लोक वर्षभर शस्त्रविद्या शिकत. त्यांना या दिवशी आपल्या कलेचे प्रदर्शन करण्याची संधी दिली जात असे. या दिवशी विविध स्पर्धा देखील होत. सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या व्यक्तीला बक्षीसही दिले जात असे.
खालसा पंथाच्या लोकांमध्ये जी लढाऊवृत्ती निर्माण झाली याचे मूळ आपल्याला श्री गुरू गोविंद सिंह यांनी सुरू केलेल्या होला-मोहल्लाच्या कार्यक्रमात दिसते. होला मोहल्ला कार्यक्रमाचं हे ऐतिहासिक महत्त्व आहे.

शिख समाजात होळी या सणाला मोठे महत्व आहे. त्यानिमित्त शिख समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात दरवर्षी हल्लाबोलची मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षी कोरोना संसर्गाचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊन लावण्या आले आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्या वतीने कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाला परवानगी देता येणार नाही असा आदेश यापूर्वीच काढला होता. मात्र या आदेशाची पायमल्ली करत हल्लाबोल मिरवणुकीतील काही तरुणांनी परवानगी का नाकारली म्हणून चक्क पोलिसांच्या दिशेने तुफान दगडफेक केली. यात सहा पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून पोलिस अधीक्षक यांच्या वाहनांसह अन्य वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या गाड्यांचे प्रचंड नुकसान करण्यात आले आहे.

पोलिस अधिक्षक धुलिवंदनाच्या दिवशी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर केलेल्या हल्ल्याच्या अनुषंगाने कोणाचीही गय केली जाणार नाही. सदर प्रकरणातील दोषींना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणात ३०० जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून ६० जणांची सीसीटिव्ही फुटेजवरुन ओळख पटविण्यात येत आहे . या प्रकरणात १८ जणांना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी दिली.

यावेळी पोलीस अधीक्षक पुढे बोलताना म्हणाले की, नांदेड येथील श्री सचखंड गुरुद्वाराच्या वतीने दरवर्षी धुळवडीच्या दिवशी पारंपारिक पद्धतीने हातात उघडी शस्त्रे प्रतिकात्मक हल्ला बोल मिरवणुक काढण्यात येते. मात्र, यंदा लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मिरवणुकीसाठी परवानगी नाकारली होती. सोमवारी सायंकाळी चार वाजता गुरुद्वारात आरती झाल्यानंतर मात्र तरुण भाविकांचे जत्थे हातात उघड्या तलवारी घेवून मिरवणुक गुरुद्वाराच्या बाहेर घेवून आले. यावेळी पोलिसांनी अटकाव करताच त्यांच्यावर भाला आणि तलवारीने हल्ला करण्यात आला. यामध्ये आठ पोलिस कर्मचारी जखमी झाले असून पोलिसांच्या आठ वाहनांचे नुकसान झाले आहे.

लॉकडाऊन असल्यामुळे यंदा मिरवणुकीला परवानगी नाकारली होती. मिरवणुक काढू नये म्हणून जिल्हाधिकारी विपीन ईटणकर आणि मी गुरुद्वाराची प्रशासकीय समिती व संत बाबा कुलवंतसिंगजी, संत बाबा बलविंदरसिंगजी यांच्याशी चर्चा केली होती. सर्वांनी त्यावेळी मिरवणुक काढणार नसल्याचे स्पष्ट केले. या बद्दल समाजाला आवाहनही केले होते. मात्र, २९ मार्च धुळवडीच्या दिवशी सायंकाळी चार वाजता अरदास झाल्यानंतर गुरुद्वाराच्या आत हल्ला बोल मिरवणुक काढण्यात आली. यावेळी काही अतिउत्साही तरुणानी मिरवणुक गुरुद्वाराच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी धर्मगुरुंनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीच ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हते.

पोलिसांना होती पूर्वसुचना मागील वर्षी लॉकडाऊन असताना न्यायालयाच्या परवानगीने दसऱ्यानिमित्त गुरुद्वारातून मिरवणुक काढण्यात आली होती . मात्र, त्यावेळी मोठा गोंधळ उडाला होता . मिरवणुकीत मास्क वापरण्यात आले नव्हते. सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला होता. पोलिसांसोबत धक्काबुक्कीचा प्रकारही घडला होता. यावेळीही तसाच काहीसा प्रकार होणार याची पूर्वसुचना होती, अशी कबुली पोलिस अधीक्षक शेवाळे यांनी दिली.

धर्मिक भावना आणि कोरोना यांचे काहीसे वाकडेच आहे. ज्या समुहाच्या धार्मिक भावना उंचबळून येतात, तो समुह कुणाचेही काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. कोरोनासारख्या अतिसंवेदनशील परिस्थितीत शासन प्रशासनालाही काय करावे हे सुचेनासे झाले आहे. लाॅकडाऊन करावे तर गोरगरीब मरतात, नाही करावे तर कोरोना वाढतो. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे कट्टर धार्मिक वादी लोकांनी कोरोनाला हलक्यात घेऊ नये. अन्यथा इतिहासात दुष्ट धार्मिक लोकांनी कोरोना पसरवला अशी नोंद होईल.

गंगाधर ढवळे,नांदेड

संपादकीय
१.०४.२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *