नवी दिल्ली, दि. १२ मार्च २०२५:
देशातील विविध राज्यांच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेची कार्यक्षमता व गुणवत्ता वाढवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून, त्यावर देखरेख करण्याचे काम देखील केले जाईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी म्हटले आहे. खा. अशोक चव्हाण यांनी आज राज्यसभेत विचारलेल्या एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
सार्वजनिक आरोग्याशी निगडीत या महत्वपूर्ण विषयावर बोलताना माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण म्हणाले की, आरोग्य हा राज्यांच्या अखत्यारीतला विषय आहे. केंद्राकडून राज्यांना निधी दिला जातो. मात्र, अनेक राज्यात आरोग्याशी निगडीत योजनांच्या अंमलबजावणीत अडथळे दिसून येतात. ग्रामीण रुग्णालयांच्या इमारती तयार होतात. मात्र, दोन-तीन वर्ष त्या कार्यान्वीत होत नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांचीही तीच स्थिती आहे. अनेक ठिकाणी सीटी स्कॅन, एमआरआय मशीन सारखी उपकरणे योग्य देखभालीअभावी बंद असतात.
वैद्यकीय अधिकारी, पॅरामेडिकल स्टाफची पुरेशी भरती होत नाही. राज्य लोकसेवा आयोगाकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया दोन-तीन वर्ष सुरु राहते. ही सर्व प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने राबवून केंद्र सरकारने त्यावर लक्ष ठेवावे, अशी मागणी खा. अशोक चव्हाण यांनी आपल्या प्रश्नातून मांडली होती.